ई- पिक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिकांची माहिती भरावी- महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

0
25
• सवणा येथे ई-पीक पाहणी प्रात्याक्षिक
बुलडाणा, दि. 14 : राज्य शासन शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेत आहे. शासन विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी काम करीत आहे. आतापर्यंत शेतातील पिकांची माहिती तलाठी यांच्यामार्फत भरल्या जात होती. यामध्ये बऱ्याच त्रुटी राहत होत्या. अनेक वेळा यामधून शेतकऱ्यांचे नुकसान व्हायचे. राज्य शासनाने या खरीप हंगामापासून तंत्रज्ञानाचा उपयोग करीत ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करण्याचे ठरविले. त्यानुसार शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरीत ई पीक पाहणी करीत आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची माहिती या ॲपमध्ये भरून अचूक माहितीची नोंद करावी, असे आवाहन राज्याचे महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केले. चिखली तालुक्यातील सवणा येथे चंदनशेष क्रीडा व व्यायाम मंडळ यांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
कार्यक्रमाला व्यासपीठावर केंद्रीय ग्रामविकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, माजी जि.प अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, माजी आमदार राहुल बोंद्रे, संस्थेचे अध्यक्ष पद्माकर भुतेकर, सचिव कैलास करवंदे, अभिजीत राजपूत, अर्जुन गाडे, सरपंच सत्यभामा सुरडकर आदी उपस्थित होते. सुरूवातीला मैदानावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच 150 पाम वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रास्ताविक कैलास करवंदे यांनी केले. त्यानंतर शेतकरी अनंत भुतेकर यांच्या शेतात ई- पीक पाहणी प्रात्याक्षिक करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. हांडे, तहसिलदार श्री. येळे, तालुका कृषि अधिकारी अमोल शिंदे आदी उपस्थित होते.
नुकसानीने शेतकऱ्यांनी खचून जावू नये; शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी- महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
• कोलवड, पाडळी, रोहीणखेड, अंत्री, बोराखेडी, वडगांव खंडोपंत येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी – नाल्यांना पूर आले. पुरामुळे नदी, नाल्य काठावरील शेतांची दुर्दशा झाली आहे. पुराने शेती खरडून गेली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी खचून जावू नये. शासन अशा संकटसमयी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा धीर राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज शेतकऱ्यांना दिला. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. बुलडाणा तालुक्यातील कोलवड शिवारात पैनगंगेच्या पुरामुळे झालेल्या शेती नुकसानीची पाहणी केली. तसेच पाडळी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणीही त्यांनी केली. त्यानंतर मोताळा तालुक्यातील रोहीणखेड, बोराखेडी, अंत्री, वडगांव खंडोपंत येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यंत्रणांनी पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय ग्राम समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसिलदार रूपेश खंडारे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. डाबरे, तालुका कृषि अधिकारी श्री. मेरत आदी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. शासन सर्वोतपरी मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मोताळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी गणेश देशमुख, तहसिलदार श्री. सोनावणे व संबंधित तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.