स्वराज्य ध्वजाला गोंदियाच्या प्रसिद्ध मांडोदेवी मंदिरात अभिवादन

0
38

गोंदिया, ता. 16 : सातव्या यशस्वी दिवसात पदार्पण करत आणि राज्यातील हजारो नागरिकांचे तसेच प्रेरणास्थळांकडून आशिर्वाद घेत आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतील स्वराज्य ध्वजाने आज पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात थांबा घेतला आहे. आज गोंदियाचं ग्रामदैवत आणि शक्तीस्थान समजल्या जाणा-या सूर्यदेव-मांडो देवी मंदिरात ध्वज मोहिमेने भेट दिली. दूर जंगलात काहीशा दुर्गम ठिकाणी असणा-या या मंदिरातही स्वराज्य ध्वज प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी अनेकजण मोठ्या आतुरतेने हजर राहिले.

अत्यंत शांततापूर्ण वातावरणात कोविड साथरोगासंबंधीच्या सर्व नियमांचे पालन करत चाललेली हि स्वराज्य ध्वज मोहिम राज्याच्या अनेक शहरांमधून वाटचाल करते आहे. शिवरायांनी दिलेल्या शौर्य, समता आणि कर्तव्यनिष्ठतेच्या वारशाची नव्या युगातील ओळख म्हणजे हा ७४ मीटर उंच स्वराज्य ध्वज आहे. त्याचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणून केलेल्या प्रतिमेचे विविध शहरे व राज्यांमधून अत्यंत जोषात स्वागत होत आहे. आज गोंदियातील घनदाट जंगलात डोंगरकपा-यात वसलेल्या सूर्यदेव आणि मांडो देवी यांच्या मंदिरातही हा ध्वज पोहोचल्यानंतर अत्यंत उत्साहात त्याचे स्वागत झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. यावेळी अशोक शहारे, सतीश देशमुख, विनोद पंधरे ,सचिन शेंडे, केतन तुरकर, राजू एन जैन, लता रहांगडाले, प्रतीक भालेराव, जिमी गुप्ता, विनायक शर्मा, मोहित गौतम, कपिल बावणथळे, सौरभ जायस्वाल, महेश करियार, रमण उके, सौरभ रोकडे, नागो बन्सोड, पिंटू कटरे, लखन बहेलिया, कुणाल बावणथळे, दर्पण वानखेडे, अमन घोडीचोर, मंगेश रंगारी, सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

भेदभावाची परंपरा खंडीत करून राज्यातील सर्वच जातीधर्माच्या स्थानिकांकडून अभिवादन स्वीकारत चाललेला आणि शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची आठवण करून देणारा स्वराज्य ध्वज आज विदर्भातही चर्चेचं केंद्र बनला आहे. शिवाजी महाराजांनी जो स्वराज्य धर्म हयातभर पाळला, त्याच निष्ठेने महाराष्ट्राच्या प्रेरणादायी शानदार इतिहासाची देशाला ओळख करून देण्यासाठी तसेच शक्ती-भक्तीचा सर्वांगसुंदर संदेश समाजात पोहोचवण्यासाठी स्वराज्य ध्वज मोहिम वाटचाल करत आहे. आज या स्वराज्य ध्वजाचा गोंदिया जिल्ह्यात प्रवास होतो आहे. मंगळवारी सायंकाळी स्वराज्य ध्वज मोहिमेने कोरंभी येथील समस्त भंडाराचे ग्रामदैवत पिंगेश्वरी देवीच्या मंदिराला भेट दिली.

महाराष्ट्राच्या तेजोमय इतिहासाचा वारसा सांगणा-या स्वराज्य ध्वजाचे राज्यात ठिकठिकाणी उत्साही वातावरणात स्वागत होत आहे. आतापर्यंत आठ जिल्ह्यांना भेट देत स्वराज्य ध्वज मोहिमेचा प्रवास विदर्भात येऊन पोहोचला आहे. सोमवारी सकाळी शेंडगाव येथे श्री संत गाडगेबाबा मंदिरात ध्वज मोहिमेचे स्वागत करण्यात आले. पुढे मोझरी येथील प्रसिद्ध राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिरात स्वराज्य ध्वज यात्रा मोहिमेने विसावा घेतला होता.
युवानेते आणि आमदार रोहित पवार यांची अनोखी संकल्पना असलेल्या स्वराज्य ध्वजाच्या या महत्त्वाकांक्षी प्रवासाला सुरूवात झाल्यापासून गेले काही दिवस नगर, कर्जत-जामखेड, जुन्नर, नाशिक, धुळे, बुलढाणा आदी शहरांतील जनतेने उदंड प्रतिसाद देऊन ठिकठिकाणी ध्वजाचे दिमाखात व उत्साहात स्वागत केले आहे. स्वराज्यध्वजाच्या प्रवासाचा शुभारंभ अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू संत श्री गोदड महाराज यांच्या मंदिरात गुरूवार दि. ९ सप्टेंबर रोजी ध्वजाचे मंगल पूजन करून झाला होता. जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला, लेण्याद्री देवस्थान, ओझरचे विघ्नेश्वर देवस्थान, पेमगिरी किल्ला, श्री साईबाबा संस्थान शिर्डी, वणीचे सप्तश्रृंगी मातेचे मंदिर येथे आतापर्यंत ध्वजाने भेट दिली आहे.  हा वैशिष्टयपूर्ण ७४ मीटर उंच भगवा ध्वज सर्व जातीधर्मांच्या लोकांचा ध्वज असून महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी लोकसहभागातून परंतु कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करून हि ध्वज यात्रा एकूण ३७ दिवस प्रवास करणार आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

मानवतेचे आणि भक्ती-शक्तीचे प्रतिक असणारा हा स्वराज्य ध्वज सर्वच जाती-धर्माच्या लोकांसाठी स्फूर्तीदायी आहे. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एक अभिमान वीरपताका म्हणून भगव्या ध्वजाचं महत्त्व उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राचा हा गौरवशाली संपन्न व अभिमानास्पद इतिहास युवावर्गाला प्रेरणा देणारा असून अवघ्या देशवासियांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याच्या हेतूने हि स्वराज्य ध्वज यात्रा सुरू करत असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
भगवा ध्वज हा आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा तेजोमय साक्षीदार आहे. त्याला पाहताच मनात भक्ती,शक्ती, त्याग व शौर्याची भावना दाटून येते. विनम्रता, परमार्थ व त्याग शिकवणारा हा भगवा ध्वज महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची ओळख अवघ्या देशात ठसवणा-या भगव्या ध्वजाला आपल्या परंपरेत धार्मिक, आध्यात्मिक, सामरिक महत्त्व आहे. याच कारणांमुळे तसेच कर्जत-जामखेडची नवी ओळख तयार करण्याच्या दृष्टीकोनातून आपण ही स्वराज्य ध्वजाची संकल्पना साकारत असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय.

निजामाविरूद्ध शिवरायांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावनभूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्ट्ण अर्थातच खर्ड्याचा भुईकोट किल्ला. या किल्ल्यावरच स्वराज्यातील अखेरची परंतु विजयी लढाई खेळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने निजामाला मात दिली. या परिसराचे व किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प रोहित पवार यांनी केला आहे. याच प्रेरणेतून किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर देशप्रेमाची असीम ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा शौर्याचं प्रतिक असा भव्य-दिव्य भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे. हा आगळा-वेगळा भगवा ध्वज देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज ठरणार आहे.
भगवा ध्वज हा आपल्या सर्वांचेच स्फूर्तीस्थान आणि अभिमान आहे. अत्यंत ऊर्जादायी असा हा भगवा रंग सर्वांसाठीच सहिष्णुतेचा, समानतेचा आणि एकीचा संदेश देणारा आहे. देशाचे भवितव्य असलेल्या युवा शक्तीला प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी हा ध्वज सकारात्मक विचार व प्रेरणा देईल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६*६४ फूट असून वजन ९० किलो आहे. तर ध्वजस्तंभाची उंची देखील ७४ मीटर असून तो ९० टन वजनाचा आहे.

दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रातील वर्ध्याचा सेवाग्राम आश्रम, राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया(बिहार), केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधीक पूजन करावे हि या प्रवासामागील लोकभावना आहे. त्यासाठी ६ राज्यांतील १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.
हि स्वराज्य ध्वज पूजन यात्रा पूर्णपणे लोकसहभागातून आणि सहकार्यातून संपन्न होणार आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://rohitpawar.org/swarajyadhwaj/  या संकेतस्थळावर पाहाता येईल.