जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात भरीव योगदान द्या- पालकमंत्री प्राजक्त तनपुरे

0
43
  • पालकमंत्र्यांनी घेतला विविध विभागाचा आढावा

          गोंदिया,दि.11 : विकासासाठी सर्व विभागांनी प्रयत्नरत राहून शासनाच्या योजना सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध रहावे असे निर्देश राज्यमंत्री, नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. आज जिल्ह्यातील सर्व विभागाची आढावा बैठक त्यांनी घेतली. आपला गोंदिया जिल्हा विकासात अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

         जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार मनोहर चंद्रिकापूरे, जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपवनसंरक्षक कुलराज सिंह, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्याची यावेळी माहिती दिली. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. सन २०२०-२१ मध्ये एकूण १५१ धान खरेदी केंद्रावर ७२ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आले असून सन २०२१-२२ मध्ये ४४ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात कोविड लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १० लाख ६२ हजार ९३२ व दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या ८ लाख ३१ हजार १०६ एवढी आहे.

          स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पाणी पुरवठा, आरोग्य योजना व ग्रामीण विकासाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादरीकरण केले. यावेळी पालकमंत्र्यांनी वीज विभागाचाही आढावा घेतला. यात प्रामुख्याने वीज जोडण्या, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, अनुसूचित जमाती उपयोजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना व अन्य योजनांचा समावेश आहे. गोंदिया शहरात भूमीगत वीज वाहिनी टाकणे याबाबतीतही यावेळी चर्चा करण्यात आली. पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर घेण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

          नगरविकास विभागाच्या विकासाचा यावेळी आढावा घेण्यात आला. सुवर्ण जयंती नागरोत्थान योजनेत मिळालेला निधी वाटप करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त निधी नगरपालिकांना वितरित करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून विकास कामे सुरू झाली आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी दिली. शहरात साधारण ७० टन कचरा निर्माण होत असून तो कचरा खासगी प्रकल्पाला व्यवस्थापन करण्यासाठी देण्यात येतो. हा अभिनव उपक्रम आहे.

          गोंदिया जिल्ह्यात साधारण ४८ टक्के वनक्षेत्र आहे. शासनाच्या विविध योजना या भागात प्राधान्याने राबविण्यात येत असल्याचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांनी सांगितले. जिल्हा वार्षिक योजनेत रोपवन घेण्यात आले आहेत. रोपवन जगण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर आहे. हाजराफॉल येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असून यावर्षी २३ लाख रुपये महसूल प्राप्त झाला. पांगडी येथे जैवविविधता उद्यान करण्यात आले आहे. गडेगाव येथे मोहफुल प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे.

           जिल्ह्यात पावसाची सरासरी चांगली असून 65 हजार हेक्टरवर उन्हाळी भाताची पेरणी झाली आहे. कृषी विभागाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविण्यात येतात. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतूनही कृषी विकास योजना राबविण्यात येतात. जिल्हा वार्षिक योजनेत सन २०२१-२२ साठी तिन्ही योजना मिळून २५४ कोटी निधी प्राप्त झाला होता, तो शंभर टक्के खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले यांनी दिली. कोविड, लसीकरण, आरोग्य विभाग, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा नियोजन आदी विभागाचा यावेळी आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागाने सादरीकरण करून माहिती दिली.