वीजेची बचत काळाची गरज आहे- रमेश झरारीया

0
151

तिरोडा,दि.१6 : वीजेची बचत ही काळाची गरज आहे. वीजेचा योग्य वापर केला तर भविष्यात मोठ्या प्रमाणात वीजेची बचत होऊ शकते. विद्यार्थ्यांनी वीज सुरक्षेबाबत व वापराबाबत जागरुक असावे असे प्रतिपादन शहीद मिश्रा विद्यालयाचे अध्यक्ष रमेश झरारीया यांनी केले. तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालयात आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्युत निरीक्षक विजय खापर्डे, मुख्याध्यापक रमण नागपुरे, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुनिल मोहुर्ले व विद्युत कंत्राटदारांच प्रतिनिधी प्रभाकर रावत उपस्थित होते.
विजय खापर्डे यांनी विद्यार्थ्यांना वीजेचे महत्व व वीजेच्या सुरक्षित वापराबाबत यावेळी मार्गदर्शन केले. रमण नागपूरे यांनी विद्युत सुरक्षा सप्ताहात आत्मसात केलेल्या बाबी अंमलात आणाव्या असे सांगून वीज सुरक्षा व वापराबाबत सदैव जागरुक राहावे असे सांगितले. सुनिल मोहुर्ले यांनी विद्यार्थ्यांना वीज निर्मिती ते वीज वितरण पर्यंतची कार्यपद्धतीबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार कनिष्ठ अभियंता राजेश आकरे यांनी केले.
या सप्ताहानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला रमेश झरारीया यांनी हिरवी झेंडी दाखविली. रॅलीच्या दर्शनी भागात बँडपथक व एनसीसी विद्यार्थी असून रॅलीचे संचालन एनसीसी कमांडंट सुनिल शेंडे यांनी केले. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी घोषणा, घोषणाफलकाच्या माध्यमातून वीज वापराबाबत जागरुकता केली. मुख्य रस्त्यावरुन रॅलीने भ्रमण केले.
कार्यक्रमाला वीज वितरण कंपनीचे अधिकारी/कर्मचारी, दिनेश देशमुख, किशोर येसनसुरे, आशिष साहुसाकडे, राहुल परचाके, वीज कंत्राटदार संघटनेचे प्रतिनिधी नानुरे, आगलावे, मुलचंदानी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.