आज लाभार्थी परिसंवाद कार्यक्रम, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री साधणार संवाद

0
11

* सिमला येथे राष्ट्रीय परीसंवाद
* नवी दिल्ली येथून प्रधानमंत्री तर मुंबईतून मुख्यमंत्री संबोधित करतील
* गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा ऑनलाईन सहभाग
* पंचायत समिती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन
 गोंदिया, दि. 30 : भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने देशभरात आझादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या धर्तीवर शासनाने मंगळवार 31 मे 2022 रोजी लाभार्थ्यांसोबत परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी 09.30 वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तर सकाळी 11 ते दुपारी 12 पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाभार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.

         31 मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे हिमाचल प्रदेशातील सिमला येथील आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे राज्य, जिल्हास्तरावर स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांसह 13 योजनांच्या निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार  आहेत.

         जिल्हास्तरावर गोंदिया येथे पंचायत समिती सभागृहात जिल्ह्यातील विविध योजनेतील लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. लाभार्थ्यासोबतच लोकप्रतिनिधींना या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने मंगळवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी तयारी केली आहे. मंगळवारी होणाऱ्या या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, स्वच्छ भारत अभियान, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र एक राशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्मान भारत योजना, आरोग्य योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजनांमधील लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री संवाद साधणार आहे.

              पंतप्रधानांचा परीसंवाद कार्यक्रम दोन सत्रामध्ये आयोजित केला जाईल. पहिला सत्र राज्य आणि जिल्हा कार्यक्रमांच्या स्वरुपात सकाळी 10.15 वाजता सुरु होईल  व सकाळी 10.50 वाजता समारोप हाईल. या प्रसंगी पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता देखील लाभार्थ्यांना हस्तांतरित केला जाईल. यासाठी कृषी विज्ञान केंद्रामध्ये समांतर कार्यक्रम  आयोजित करण्यात येणार आहे.

           दुसरे सत्र राज्य आणि जिल्हास्तरीय शिमला येथील राष्ट्रीय कार्यक्रमाशी जोडला जाईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमध्ये विविध सोशल मीडीया व्टिटर, फेसबुक, यु–ट्युब आदी चॅनेलवर हा कार्यक्रम लाईव्ह प्रसारित करण्यात येणार आहे.

           तर राज्य शासनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता होणार आहे. शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी तसेच योजनाच्या यशस्वीतेसंदर्भात लोकप्रतिनिधी व मुख्यमंत्री यांच्यामध्ये ही संवाद होणार आहे. विविध जिल्ह्यातून लोकप्रतिनिधी व लाभार्थी यामध्ये सहभागी होणार आहे. दृकश्राव्य माध्यमातून हा सहभाग असेल, यासाठी पंचायत समिती सभागृह गोंदिया येथे जिल्हा प्रशासनाने लाभार्थ्यांना व लोकप्रतिनिधी तसेच मान्यवरांना आमंत्रित केले आहे. नागरिकांनी या परिसंवादाचा प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा विविध माध्यमांवर ऑनलाइन उपस्थिती दर्शवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी नयना गुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन व ग्रामविकास विभाग या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे.