ब्रम्हपुरी : वाघांची संख्या वाढत असली तरीही जंगलक्षेत्र त्यांना कमी पडत असल्याने अधिवास आणि अस्तित्त्वाच्या लढाईसाठी वाघांमध्ये झुंज देखील पाहायला मिळते. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाने वाघांच्या अशा अनेक झुंजी अनुभवल्या आहेत. मात्र, आता इतरत्र देखील वाघांची संख्या वाढल्यामुळे वाघांमध्ये लढाई होण्याचा प्रकार सुरू झाला आहे. नागभिड वनपरिक्षेत्रालगतच्या ग्रामस्थांनी दोन वाघांमधील झुंजीचा थरार अनुभवला खरा, पण आता हे दोन वाघच वनखात्याला गवसलेले नाहीत.
मानवी जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि जखमी वाघाला लवकरात लवकर जेरबंद करुन त्याच्यावर उपचार करता यावे म्हणून वनविभागाने शोधमोहीम सुरू केली आहे. नागभीड वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७५६ मध्ये ही घटना घडली. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या झुंजीतील एक वाघ गंभीररित्या जखमी झाला आहे. परिसरातील रक्ताच्या सड्यावरुनच हे स्पष्ट होत आहे.
नागभिड वनपरिक्षेत्रातील वासाडा मक्ता परिसरात स्थानिक ग्रामस्थांनी दोन वाघांमधील झुंजीचा थरार अनुभवला. या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोन वाघांमध्ये जोरदार झुंज झाली. परिणामी, एक वाघ यात गंभीररित्या जखमी झाला. घटनास्थळावर अक्षरश: रक्ताचा सडा पडलेला होता. ग्रामस्थांनी लागलीच या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली. मात्र, वनविभागाची चमू पोहचेपर्यंत हे दोन्ही वाघ याठिकाणाहून बेपत्ता झाले. वनविभागाची चमू घटनास्थळी पोहोचली तेव्हा यापरिसरात मोठ्या प्रमाणावर रक्त सांडले होते. यानंतर जखमी वाघाचा शोध घेण्यासाठी वनविभागाच्या चमुने या परिसरात शोध मोहीम सुरू केली. वाघ जखमी असल्याने परिसरातील लोकांच्या जिविताला देखील धोका निर्माण झाला आहे. कारण जखमी वाघ हल्ला करण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी वाघाच्या मागे जाऊ नये किंवा जंगलात प्रवेश करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.