“जय शिवाजी, जय भारत” पदयात्रेला वाशिमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आ.किरणराव सरनाईक यांच्या हस्ते जय शिवाजी जय भारत पदयात्रेला हिरवा झेंडा
वाशिम,दि.१९ फेब्रुवारी -आजच्या नवयुवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेत शिक्षण, राष्ट्रविकास आणि समाजसेवेत पुढे यावे. केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे, तर स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि शिस्त यांचे पालन करून समाजासाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे. शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपले कार्य अधिक प्रभावी करण्याचा संकल्प केला पाहिजे.शिवरायांचा आदर्श घेऊन शिक्षण व राष्ट्रविकासासाठी कार्य करूया असे प्रतिपादन आ. किरणराव सरनाईक यांनी केले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित कार्यक्रमात अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरणराव सरनाईक अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल, उपजिल्हाधिकारी दादासाहेब दराडे, तहसीलदार निलेश पळसकर, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल कावरखे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत तसेच शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ.किरणराव सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जय शिवाजी जय भारत पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मार्गस्थ होऊन बाकलीवाल विद्यालय, रिसोड नाका, पाटणी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी समारोप झाला.
यावेळी आ. किरणराव सरनाईक यांनी शिवरायांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत, तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि समाजासाठी सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन केले. आयोजकांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती सांगत, समाजात एकता आणि राष्ट्रप्रेमाचे बळ वाढावे, हा या पदयात्रेचा उद्देश असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी श्री . घुगे यांनी प्रास्ताविकातून पदयात्रेची माहिती देत शिवरायांचे शौर्य, प्रशासनकौशल्य आणि दूरदृष्टी यांचे महत्त्व पटवून देत, आजच्या तरुणांनी त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे आवाहन केले. त्यांनी शिवरायांचा आदर्श घेऊन समाजात एकता, शिस्त आणि राष्ट्रसेवेची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श प्रशासन आणि नेतृत्व कौशल्य यावर भर देत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हे, तर एक आदर्श प्रशासक आणि जनतेचे राजा होते. त्यांचे धोरण, शिस्तबद्ध प्रशासन आणि लोककल्याणकारी निर्णय आजही मार्गदर्शक ठरतात. शिवरायांनी निर्माण केलेली स्वराज्य संकल्पना आणि स्वाभिमानाचा वारसा जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आजच्या तरुणांनी त्यांचे विचार आत्मसात करून राष्ट्रविकासात योगदान द्यावे.”
तसेच, त्यांनी या पदयात्रेतील उत्स्फूर्त सहभागाबद्दल नागरिकांचे आणि आयोजकांचे आभार मानले. “शिवरायांचे विचार आणि त्यांच्या पराक्रमाची प्रेरणा नव्या पिढीला मिळत राहो,” असा शुभेच्छा संदेश त्यांनी दिला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, युद्धनीती आणि सुरक्षाव्यवस्थेच्या दूरदृष्टीवर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले.
छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांच्या जिवनावर नाट्य, पोवाडे, वेशभुषा, लेझीम, लाठीकाठी, दांडपट्टा सादरीकरणाने शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
या पदयात्रेने उपस्थितांच्या मनात शिवचरित्राचा उजाळा दिला गेला.नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने वातावरण शिवमय झाले होते. युवक, महिला, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिकांनी, शालेय विद्यार्थी , एनसीसी विद्यार्थी, स्काऊट गाईड मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला. आयोजकांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करत, शिवचरित्र जागर करण्यावर भर दिला.
या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी पदयात्रेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून देत उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. संचालन प्रा.गजानन वाघ तर आभार शाहु भगत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन, शिवजयंती उत्सव समितीने पुढाकार घेतला.