23.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home Top News गोंदिया जिल्ह्यात उष्माघाताचा बळी;३८ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात उष्माघाताचा बळी;३८ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू

0
314

अर्जुनी-मोर.  दि. २१ मे गोंदिया जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताची धक्कादायक घटना समोर आली असून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथील शेतमजुराचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत शेतमजुराचे नाव विनोद विश्वनाथ राऊत (वय 38), रा. देवलगाव, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया असे आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४४ अंशांच्या पुढे जात असल्याने नागरिकांसह शेतमजुरांवर उष्णतेचा मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी कष्ट करणाऱ्या शेतमजुराच्या मृत्यूची घटना घडल्याने ग्रामीण भागात चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद राऊत हे रोजंदारीवर शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सध्या रब्बी हंगामातील धान पिकाची कापणी व बांधणीची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याने ते आज (ता.21 ) गुरुवारी सकाळी एका शेतकऱ्याकडे कामासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास कडक उन्हात काम करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे त्यांनी घरी जातो म्हणून निघून आले मात्र गावात येताच रस्त्याच्या कळेला कोसळले. परिसरात फारशी वर्दळ नसल्यामुळे सुरुवातीला ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. बराच वेळ ते उन्हात पडून राहिल्याने त्यांची प्रकृती आणखी गंभीर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्थानिक आश्रम शाळेतील अधीक्षक पदावर असलेल्या वैशाली जांभूळकर यांनी मृतक पडलेला दिसून येताच माणुसकीचा धर्म जपत तातडीने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, नवेगावबांध येथे आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
प्राथमिक वैद्यकीय माहितीनुसार, उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लोथे यांनी व्यक्त केली असून पुढील वैद्यकीय व प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
मृतक विनोद राऊत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य गमावल्याने संपूर्ण कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून कुटुंबाला दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर न पडण्याचे, पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचे तसेच शेतमजूर आणि मैदानी काम करणाऱ्यांनी वेळोवेळी विश्रांती घेण्याचे आवाहन केले आहे.

blank