अर्जुनी-मोर.-नवेगावबांध लघु प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासंदर्भात स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या हरकती व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पाटबंधारे उपविभाग, नवेगावबांध येथे २४ जून २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी समीर बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले.बैठकीस नवेगावबांध ग्रामपंचायतीच्या सरपंच हिराताई पंधरे, उपसरपंच रमण डोंगरवार, पोलीस स्टेशनचे ठाणेदार, पंचायत समिती सदस्य, विविध गावांचे सरपंच, पोलीस पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
बैठकीत ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाकडून शेतजमिनींची मोजणी करण्याबाबत तसेच तलावातील पाण्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी सविस्तर स्पष्टीकरण देत नवेगावबांध लघु प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचे सीमांकन व अतिक्रमण हटविण्याचे कार्य शासनाच्या निर्देशानुसार करण्यात येत असल्याचे सांगितले.यावेळी फुल टँक लेव्हल (FTL), FTL+२/३ फूट आणि हाय फ्लड लेव्हल (HFL) या तीन स्तरांबाबत माहिती देण्यात आली. तलाव पूर्ण भरल्यानंतर येणारे पाणी, पूरस्थितीत होणारे परिणाम आणि भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी सीमांकनाचे महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगण्यात आले.
ग्रामस्थांमध्ये पसरलेल्या “शासन जमीन ताब्यात घेणार” या अफवांनाही अधिकाऱ्यांनी उत्तर दिले. विधानसभेतील प्रश्नोत्तरांच्या अनुषंगाने संबंधित गट क्रमांकांची मोजणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच भूमिअभिलेख विभागामार्फत प्रथम मोजणी करून त्यानंतर पूररेषा आखण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असता ती मान्य करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.बैठकीच्या शेवटी ग्रामस्थांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले असून प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय ठेवून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी समीर बनसोडे यांनी स्पष्ट केले.





