वर्ध्यात ११ पासून सत्यशोधकी साहित्य संमेलन

0
8

वर्धा ता.२- महात्मा जोतिबा फुलेंच्या समताधिष्ठित सत्यशोधकी विचारांच्या आधारावर सर्जनशील व जीवनवादी साहित्य निर्मितीला गतिमान करण्यासाठी वर्धा येथे ११ व १२ फेब्रुवारी रोजी शिववैभव सभागृहात (व्यंकटराव गोडे साहित्य नगरी) दहावे सत्यशोधकी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाची माहिती स्वागताध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ संशोधक, लेखिका डॉ. गेल ऑम्व्हेट (सातारा) यांची निवड झाली. उद्‌घाटन प्रसिद्ध विचारवंत व नाट्यलेखक ज्ञानेश महाराव (मुंबई) करणार आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडी निघेल. प्रमुख पाहुणे म्हणून अ. भा. सत्यशोधक समाजाचे माजी अध्यक्ष ॲड. वसंत फाळके, उत्तमराव पाटील, चेतना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश सवाई, ॲड. शिवाजी शिंदे, डॉ. श्रीराम गुंदेकर, माजी संमेलनाध्यक्ष नागेश चौधरी, प्रा. नूतन माळवी उपस्थित राहतील. उद्‌घाटन सत्रानंतर सहा ग्रंथांचे प्रकाशन, लेखक-कार्यकर्त्यांचा सत्कार व सायंकाळी साडेसात वाजता कविसंमेलन होणार आहे.
चार परिसंवादांची मेजवानी
शनिवारी (ता.११) दुपारी दोन वाजता प्रा. उगले यांच्या अध्यक्षतेखाली ‘सत्यशोधक साहित्य आणि सामान्य माणूस’ या विषयावरील परिसंवाद, दुपारी चार वाजता ‘सत्यशोधकी साहित्य प्रवाह : परिवर्तनवादी साहित्य प्रवाहांचे मूलस्रोत’ परिसंवाद होईल. रविवारी (ता.१२) सकाळी दहा वाजता ‘सत्यशोधकी स्त्रीवाद : भूमिका व वास्तव’ परिसंवाद, लोकशाहीर संभाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेअकराला ‘सत्यशोधकी माध्यमे आणि तरुणांचा सहभाग’ परिसंवाद होईल.
डॉ. साळुंखे यांची प्रकट मुलाखत
महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीचा साक्षेपी अभ्यास करून सत्यशोधकी मूल्ये समाजमनात रुजविणारे प्रसिद्ध विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांची रविवारी (ता.१२) दुपारी दीड वाजता प्रकट मुलाखत घेण्यात येईल.