सात-बारा विषयी तलाठ्यांची १५ मार्च रोजी ग्रामसभा

0
90

गोंदिया,दि.२ : महसूल खात्यातील महत्वाची कामे म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर मुले व मुली यांची नावे वारसा हक्काने सात-बारावर नोंदविणे, वडील व मुले यांच्यामध्ये किंवा भावा-भावामध्ये शेतजमिनीची वाटणी करुन खाते फोड करणे, वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये करणे, जमीन जर सिंचनाखाली असेल आणि त्याची नोंद सात-बारावर झालेली नसेल अशा नोंदी अद्यावत करुन घेणे, ज्या मुलींचे वारसाची नोंदी सात-बारावर नसेल त्याची नोंद करुन घेणे. याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याची बाब जिल्हाधिकऱ्यांच्या निदर्शनास आली आहे.
या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी जिल्ह्यात एकाच वेळी निपटारा करण्याचे जिल्हाधिकारी काळे यांनी ठरविले असून येत्या १५ मार्च २०१७ रोजी प्रत्येक तलाठी साझ्याच्या मुख्यालयी संध्याकाळी ६ वाजेनंतर ग्रामसभा घेण्यात येणार आहे. यामध्ये वरील विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. ज्या तलाठ्यांना अतिरिक्त साझ्याचा कार्यभार आहे त्या साझा मुख्यालयी संबंधित तलाठ्याकडून दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ मार्च रोजी ग्रामसभा घेण्यात येईल व गरज पडल्यास १७ मार्च रोजी ग्रामसभा घेण्याचे नियोजन करण्याचे तहसिलदारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी सदर दिवशी सर्व संबंधित शेतकरी, ग्रामस्थ तसेच सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आदी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून ग्रामसभा यशस्वी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.