कवलेवाडा प्रकल्पाचे पाणी सोडा : राजेंद्र पटले यांची मागणी

0
11

तुमसर दि.२९: : सिंचनासाठी कवलेवाडा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात यावे, अन्यथा ३१ मे रोजी देव्हाडा फाट्यावर रास्तारोको आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. राजेंद्र पटले यांनी दिला आहे.सद्य स्थितीत बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या पाण्याचा फायदा अदानीला न देता तो जनतेच्या हितासाठी व्हावा, अशी मागणी आहे. परिसरात वीज कपात करण्याचा सपाटा खूप वेगाने वाढला आहे. पूर्वी शेतकऱ्यांना १८ तास वीज मिळत होती, परंतु आता १२ ते १६ तास वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. यासाठी विद्युत विभागाच्या विरोधात आंदोलन करावे लागले. दुसरीकडे धानाला सिंचन व्हावे म्हणून वैनगंगा नदीवरील कवलेवाडा बांध प्रकल्पाच्या सर्वच्या सर्व दरवाजे उघडण्यात यावे, अशी मागणी आहे.

बावथडी प्रकल्पाचा पाणी मांडवी, रेंगेपार, पांजरा, उमरवाडा, बोरी, बाम्हणी, माडगी, ढोरवाडा, रोहा, मुंढरी, निलज, बेटाळा, रोहणा व असे पुढील अनेक गावापर्यंत नदी पात्रात आले पाहिजे. वीज प्रकल्पाला पाणी देण्यात येऊ नये असेही निवेदनात नमूद केले आहे. दोन दिवसात कवलेवाडा प्रकल्पाचे दरवाजे न उघडल्यास ३१ मे रोजी देव्हाडा फाट्यावर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही पटले यांनी दिला आहे. वीज प्रकल्पात स्थानिक युवक बेरोजगारांना डावलण्यात आले असून परप्रांतीय लोकांना उच्च पदावर ठेवण्यात आले आहे. यापुढे ७० टक्के स्थानिक बेरोजगारांना कामावर घेण्यात आले नाही तर आंदोलन उभारू असा इशाराही इंजि. राजेंद्र पटले यांनी दिला आहे.