औद्योगिकरण व विकासाच्या नावावर जंगलतोड झाली-प्रा.सोले

0
6
  • तिरोडा,दि.26 : संपूर्ण जमिनीच्या ३३ टक्के भुभागावर जंगल आवश्यक आहे. पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर जंगले होती. परंतु औद्योगिकरण व विकासाच्या नावाने जंगलतोड झाली. त्यामुळे आता महाराष्ट्रात २०.४४ टक्के जंगल राहीलेले आहे. त्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे, असे मत प्रा. आमदार अनिल सोले यांनी केले.

    तिरोडा येथे आलेल्या वृक्षदिंडीचे स्वागत करुन डॉ. छत्रपती दुबे नगर परिषद शाळेत आयोजीत वृक्षारोपणाच्या कार्यक्रम अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय रहांगडाले, आमदार डॉ. परिणय फुके, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनिल पालांदूरकर,वनअधिकारी शेंडे,वनपरिक्षेत्राधिकारी विजय कदम, मुख्याधिकारी विजयकुमार देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले उपस्थित होते. यावेळी शालेय परिसरात विविध प्रजातींच्या झाडांचे रोपण करण्यात आले. नंतर कार्यक्रमाचे छोट्या सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी गॅस कनेक्शनचे वितरण ही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. गॅस एजेसीचे मालक प्रामुख्याने उपस्थित होते.

    आ. विजय रहांगडाले यांनी शहरात वृक्षांची संख्या कमी आहे. वृक्षारोपण व संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी नगराध्यक्ष व न.प.सदस्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगून राजकारणासोबतच समाजकारण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर आमदार फुके यांनी १ ते ७ जुलै दरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक नगराध्यक्ष देशपांडे यांनी मांडले. संचालन जंगल विभागाचे पटले यांनी केले. आभार उपाध्यक्ष पालांदूरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी नगर परिषद सभापती अशोक असाटी, नरेश कुंभारे, श्वेता मानकर, सदस्या राखी गुणेरिया, संतोष मोहने, विजय बंसोड, अनिता अरोरा, द्वारका भोडेकर, प्रभु असाटी, रश्मी बुराडे, भावना चवळे, ममता हट्टेवार, अजयसिंह गौर, जगदिश कटरे, किरण डहाटे तसेच न. प. अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले.