दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त- पालकमंत्री राजकुमार बडोले

0
13

खर्रा येथे अभियानाचा शुभारंभ
गोंदिया,दि.28 : राज्यातील वेगवेगळ्या भागात दरवर्षी दुष्काळ पडतो. लोकसहभागातून दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
26 जानेवारी रोजी गोंदिया तालुक्यातील खर्रा येथे जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर,जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, खर्रा सरपंच सुषमा पंधरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या विविध योजना हाती घेण्यात येत आहे. पाणीटंचाईच्या भागात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. भूगर्भात पाण्याची साठवणूक होण्यासाठी सिमेंट नाल्याची साखळी बांधण्यात येईल. त्यामुळे सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल.
जलयुक्त शिवार अभियान हे अत्यंत चांगले अभियान असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, याचे यश प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून आहे. अभियान राबवितांना शेतकरी, शेतमजूर यांचीही मते विचारात घ्यावी. लोकप्रतिनिधींचा सहभाग या अभियानात महत्वाचा आहे. जलसंधारणाची कामे करणाऱ्या यंत्रणांनी एकत्र येऊन आणि गावकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करावे. त्यामुळे हे अभियान पाणीटंचाईवर मात करण्यासाठी यशस्वी होईल असेही पालकमंत्री म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ.सैनी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जी कामे करण्याची आवश्यकता आहे त्या कामांची निवड ग्रामसभांनी करावी. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जलसंधारणाच्या विविध योजना राबविण्याऱ्या यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी तसेच खर्रा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी मानले.