चंद्रपुरातील तरुणतरुणींचे पकोडा आंदोलन

0
9

चंद्रपूर,दि.09: पोलीस भरतीत होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चंद्रपुरातील बेरोजगार तरुणतरुणींनी चक्क रस्त्यावर पकोडे तळून व फुकट वाटून सरकारला हाक दिली आहे.
चंद्रपुरात सध्या पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. येथे केवळ ५१ जागांसाठी भरती होत आहे. त्याकरिता राज्यभरातून तब्बल १७ हजारांहून अधिक उमेदवार या प्रक्रियेत समाविष्ट आहेत. यात स्थानिक युवकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरतीच्या जागा वाढविण्यात याव्या, या मागणीसाठी शिवसेनेचे सुरेश पचारे यांच्या नेतृत्वात पोलीस भरतीसाठी आलेल्या युवक-युवतींनी चंद्रपुरात पकोडा आंदोलन केले. त्यांनी तुकूम परिसरात ताडोबा मार्गावर पकोडे तळून नागरिकांना वाटत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात सुमारे १०० ते १५० युवक युवती सहभागी झाले होते. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा चंद्रपुरात दिवसभर होती. तसेही सध्या देशात पकोडा हा शब्दश: व खाद्यश: अशा दोन्ही अर्थांनी बहुचर्चित बनला आहे.