वर्षा रामटेके यांचा अपघातात मृत्यू

0
9

लाखनी,दि.15 : काही कामानिमित्त लाखनीहून भंडारा येथे जाताना पालांदूर क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या वर्षा दिलवर रामटेके (३०) यांचा बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील शिंगोरी-पलाडी या गावाजवळ घडली. या घटनेमुळे पालांदूर परिसरात शोककळा पसरली आहे.
रविवारला भुपेश तलमले (२६) याचा अपघाती मृत्यू झाला होता. सोमवारला त्याच्या अंत्ययात्रेतून परतल्यानंतर त्या स्वत:च्या दुचाकीने (एमएच ३६/डब्ल्यु ३९६६) भंडारा येथे जात होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर शिंगोरी-पलाडीजवळ बस क्रमांक (एमएच १४/बीटी ०८६८) ची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक लागली. यात दुचाकीचा चुराडा झाला तर वर्षा रामटेके यांचा जागीच मृत्यू झाला.
वर्षा या उच्चशिक्षित असून शिक्षिका होत्या. १५ जुलै २०१५ ला त्या पालांदूर जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपच्या उमेदवारीवर त्या निवडून आल्या होत्या. मागील ३४ महिन्यात त्यांनी या क्षेत्रात अनेक विकासकामे केली आहेत.लाखनी पंचायत समितीचे माजी सभापती दिलवर रामटेके यांच्या कन्या असून त्यांना वडिलांकडून राजकीय वारसा मिळाला होता. त्यांच्यामागे पती, आई, भाऊ व बहिण असा आप्त परिवार आहे.
घटनेची माहिती कळताच सभापती प्रेम वनवे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, उत्तम इळपाते, प्यारेलाल वाघमारे, सभापती पवन कोराम, प्रशांत खोब्रागडे, पं.स. सदस्य गोवर्धन वैद्य, विनोद बांते, प्रल्हाद भुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर आ.बाळा काशिवार, लोकसभेचे उमेदवार हेमंत पटले, गीता कापगते यांच्यासह पालांदूर परिसरातील कार्यकर्त्यांनी दिलवर रामटेके यांच्या घरी भेट दिली होती. त्यांच्या निधनामुळे पालांदूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कारधा पोलिसांनी बसचालक गोविंदा सयाम रा.नागपूर याच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.