तुमसरचा ‘तो’ दानदाता अतिक्रमणधारी निघाला

0
8

तुमसर,दि.26 : येथील राजेंद्र नगरातील वादग्रस्त जमिनीचे आतापर्यंत आपल्याच पूर्वजांनी नगरपरिषदेला जमीन दान केल्याचा कांगावा करणाऱ्यांचे श्री संताजी स्नेही समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत बिंग फोडले. परिणामी दानवीर म्हणून मिरविणारे अनाधिकृत अतिक्रमणधारी असल्याचे सिद्ध झाले आहे.यावेळी मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र बरडे, जगदिश कारेमोरे, शंकर बडवाईक, विनोद मानापुरे, सुरेश मलेवार, सुदेश थोटे, अ‍ॅड.राजेंद्र भुरे, वसंत हटवार, माला भुरे, मधुमती साखरवाडे, रामकृष्ण मलेवार, सुधाकर कारेमोरे, विजय गिरीपुंजे, सरोज भुरे, अरुण लांजेवार, सुनिल लांजेवार उपस्थित होते. आता या प्रकरणी काय कारवाई होत याकडे तुमसरवाशीयांचे लक्ष लागले आहे.
येथील राजेंद्र नगरातील सीताराम बालाजी चकोले यांच्या मालकीचे खसरा नं.७८१ मध्ये २.८६ एकर जमिनीत भदुजी पाण्याची टाकी तलाव होते. त्या ठिकाणी शहरातील कचरा टाकत असल्याने परिसरातील नेहमीच दुर्गंधी येत होती. परिणामी नगरपरिषदेद्वारे टाकी मालकांना वारंवार नोटीसी बजावून पाण्याची टाकी साफ करण्याची ताकीद दिली. मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सदर जागा नगरपरिषदेने भूअर्जन करण्याचा ठराव १९५५ मध्ये घेतला. त्यानुसार ३० जुलै १९६० रोजी २.८६ एकर जागेपैकी १.५३ एकर भूअर्जन करण्यात आली. अवार्ड पास झाला व त्या जमिनीचा त्यावेळचे १.६३७ रुपये मोबदला ही त्यांना देण्यात आला. तर उरलेली १.३३ एकर जागा ही टाकी सभोवतालची पाळीची संपूर्ण जागा अ‍ॅक्वायर करण्यासाठी नगरपरिषदेने ९ एप्रिल १९६१ रोजी विशेष सभेचे आयोजन करून नोटीफिकेशन काढण्यात आले. २० मार्च १९६५ ला राज्यपाल मुंबई व तुमसर नगरपरिषदेमध्ये सदर जागेबाबत करार करण्यात आला. त्या जागेचा मोबदलाही दिला. १९७१ पासून शिट नं.८ मध्ये ती जागा नगरपरिषद आरक्षण असे नमूद झाले. परंतु नगरपरिषदच्या दुर्लक्षामुळे त्या जागेचा फेरफार घेण्यात आलाच नाही. त्यामुळे सदर जागेचा सातबारावर सीताराम व त्यांचे वारस बाबूलालचे नाव असल्याचा फायदा घेत बाबूलाल चकोले यांचा मुलगा अशोक चकोलेनी ती जागा आमच्याच मालकीची आहे व आम्हीच नगरपरिषदेला जागा दान केल्याचा कांगावा करीत होते. सदर जागेचा त्यावेळच्या रेडीरेकनरच्या रेटनुसार मोबदलाच देण्यात आला तर यांची जागा कशी? त्याचप्रमाणे जागेचा मोबदलाच घेण्यात आला असताना यांनी दान केलीच कशी? असा सवाल उपस्थित करण्यात आला. अनधिकृत अतिक्रमणधारकाचे अतिक्रमण पाडण्यात यावे तसेच दुकान भाडेही चकोले यांच्याकडून वसूल करण्यात यावे. त्याचबरोबर नगरपरिषदेची दिशाभूल करवून शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त आलेल्या मुख्यमंत्र्यांनी दानदाता म्हणून सत्कार केले तो सत्कार अवार्ड परत करून माफी मागावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणीही श्री संताजी स्नेही समाज मंडळाच्यावतीने करण्यात आली. एक महिन्यात कारवाई न तीव्र आंदोलन करण्यात्चा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.