शेतकर्‍याचा शेतातच मृत्यू

0
8

भंडारा,दि.04ः-  जनावरांसाठी शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा शेतात मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास चुर्‍हाड शेतशिवारात घडली. विजय नरहरी माकडे (४0) रा. कोंढा असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.
रविवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्याने विजय माकडे यांनी श्रीकृष्णाची मूर्ती घरी आणली. दुपारी ३ वाजताच्या सुमारास जनावरांना गवत आणण्यासाठी चुर्‍हाड येथील स्वत:च्या शेतशिवारात सायकलने गेले. त्यांनी धुर्‍याचे ४ पेंढी गवत कापले. त्यानंतर दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास विजयचा भाऊ गिरीधर व मित्र चंदू जिभकाटे शेतावर फिरण्यासाठी गेले असता, शेतातील एका कोपर्‍यात विजय मृतावस्थेत आढळून आला. मृतदेहाशेजारी पेंढय़ा, कोयता पडलेला होता. त्याचा मृत्यू विषारी किड्याने चावा घेतल्याने झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
विजयच्या मागे पत्नी, आई, तीन भाऊ, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. आहे. चार महिन्यांपूर्वीच त्याच्या वडिलाचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती.विजयच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.अड्याळपोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतकाच्या कुटुंबास शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.