ग्राहकांनी हक्काबाबत जागरुक असावे- अतुल आळशी

0
40

जागतिक ग्राहक दिन कार्यक्रम
गोरेगाव,- : समाजातील प्रत्येक व्यक्तीचा कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ग्राहक म्हणून संबंध येतो. अनेक बनावट व भेसळ वस्तूंपासून तसेच जाहिरातीच्या माध्यमातून त्याची फसवणूक होवू शकते. अशी फसवणूक झाल्यानंतर न्याय मिळण्यासाठी ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी अभ्यासूवृत्ती जोपासून जागरुक असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष अतुल आळशी यांनी केले.
कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृह गोरेगाव येथे आज (ता.१५) जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी तिरोडा उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, गोरेगाव तहसिलदार शिल्पा सोनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.आळशी पुढे म्हणाले, ग्राहक हा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे. जो वस्तु विकत घेतो तो ग्राहक. वस्तू घेतांना त्याचे वजन योग्य आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी. वस्तूंवरील किंमतीपेक्षा अधिक दराने वस्तू खरेदी करु नये. जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे सांगितले.
ग्राहकांनी अन्याय सहन करु नये असे सांगून श्री.आळशी म्हणाले, एका ग्राहकाने दुसऱ्या ग्राहकाला मदत करावी. ग्राहकांची नेहमीच फसणूक होत असते. त्यासाठी ग्राहकांना जागृत राहण्यासाठी कायदयाचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून श्री.महिरे म्हणाले, काळाबाजार, भेसळ, फसवणूक, ग्राहकांवर होणारे अन्याय थांबविण्यासाठी ग्राहकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश आहे.
श्री.काळे म्हणाले, ग्राहकांच्या संरक्षणासाठी १९८६ चा ग्राहक संरक्षण कायदा आहे. या कायदयाची आपण अंमलबजावणी केली पाहिजे. जास्तीत जास्त नागरिकांना विशेषत: ग्रामीण भागात या कायदयाची माहिती व्हावी, लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येकाने जागृत असले पाहिजे असे सांगून राजीव गांधी जीवनदायी योजनेचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकातून तहसिलदार श्रीमती सोनाळे म्हणाल्या, ग्राहक संरक्षण कायदा १९८६ रोजी अस्तित्वात आला. ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला आहे. त्यासाठी प्रत्येकाने नेहमी जागरुक असायला पाहिजे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये. ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्काबाबत जनजागृती निर्माण करुन त्यांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष श्री.राठोड म्हणाले, ग्राहकांना त्यांचे मुलभूत अधिकार माहित होणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या प्रत्येक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच अखिल भारतीय ग्राहक पंचायत भक्कमपणे आपल्या पाठीशी उभा असतो. परंतू ग्राहकांनी आपले कर्तव्य विसरु नये असेही ते यावेळी म्हणाले.
राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ.स्मीता घरडे म्हणाल्या, ज्यांचे उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजना आहे. मेंदू आजार, कर्करोग, मुत्रपिंड या दुर्धर आजारांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येतो. यासाठी गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी गोरेगाव येथील भारत गॅस एजन्सी, वजनमाप कार्यालय गोंदिया, जय गायत्री ॲटोमोबाईल्स मुंडीपार यांचे ग्राहक प्रबोधन प्रदर्शन स्टॉल्स लावण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संचालन अशोक चेपटे व युवराज माने यांनी संयुक्तपणे केले. उपस्थितांचे आभार युवराज बडे यांनी मानले. कार्यक्रमास नायब तहसिलदार के.बी.शर्मा, जि.प.सदस्या श्रीमती सीता रहांगडाले, जिल्हा ग्राहक संरक्षणचे चिंतामन बिसेन, गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रदिप जैन व नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरवठा निरीक्षक एस.एम.शुक्ला, अर्चना पारधीकर, एस.एम.मिर्झा, स्मीता आगाशे, श्रीमती तिवारी व श्रीमती दलदले यांनी परिश्रम घेतले.
०००००