24.2 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ एसडीआरएफ जवानांचा नागपूर-मुंबई सायकल प्रवास

एसडीआरएफ जवानांचा नागपूर-मुंबई सायकल प्रवास

0
31

नागपूर,दि.01 मार्च : राज्य राखीव पोलीस दल (एसडीआरएफ) चा ७१ वा वर्धापन दिन येत्या ६ मार्चला साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत एसडीआरएफच्या जवानांतर्फे नागपूर ते मुंबई सायकल रॅली काढण्यात आली आहे. लेक वाचवा लेक शिकवा तसेच पर्यावरण वाचविण्याचा संदेश आणि एसडीआरएफ जवानांच्या कार्याविषयी जनजागृती करीत १२ दिवसाचा प्रवास करून ही रॅली ६ मार्चला मुंबईला पोहचणार आहे.
नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखवत सायकल रॅलीमध्ये सहभागी एसडीआरएफच्या ८० जवानांना रवाना केले. राज्य राखीव दलाचे कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशांतर्गत कायदा व सुव्यस्थेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. सामाजिक कार्यातही एसडीआरएफ आघाडीवर असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. रॅलीला रवाना करण्यापूर्वी कवायत मैदानावर पार पडलेल्या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, समादेशक प्रणय अशोक, जावेद अनवर, पोलीस उपायुक्त संजय शिंत्रे, एचडीएफसी बँकेचे क्षेत्रीय प्रमुख विवेक हांडा आदी उपस्थित होते. सायकल रॅलीमध्ये सहभागी एसडीआरएफचे कर्मचारी दररोज किमान ३६ ते ९० किलोमीटरचा प्रवास आणि १२ ठिकाणी मुक्काम करीत ९३८ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत. ६ मार्चला मुंबई येथे आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हे जवान सहभागी होणार आहेत.