वनकायदाच्या नावावर दर्गाचे विकासकाम थांबवले

0
19

अर्जुनी मोरगाव,दि.01 मार्चः– सप्टेंबर २०१६ मध्ये प्रतापगड येथे विकासकामे सुरू झाली होती. या कामांमध्ये महादेव पहाडीवरील पायऱ्या, प्रतापगड ते पहिल्या पायरीकडून ६ ते ७ पूल व रपटे जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आले. यामध्ये एक समाज मंदिर, शौचालय, पाणीपुरवठा विभाग नवेगावबांध यांनी प्रतापगड ते पहिली पायरी, महादेव पहाडीपर्यंत पाइपलाइन टाकली. या पाइपाइनच्या कामासाठी जंगलातून जेसीबी मशीनने खोदकाम करण्यात आले. मात्र, येथील दग्र्याच्या विकासकामांबाबत अधिकाऱ्यांकडून भेदभावपूर्ण व्यवहार होत आहे. .

प्रतापगड येथील महादेव पहाडीवर पायरीच्या कामासाठी पहाडीतील बोल्डर काढून गिट्टी फोडण्याचे काम करण्यात आले होते. यामध्ये अनेक वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. या कामासाठी वनविभागाने वनकायदा समोर करून हे काम रोखले नव्हते. कारण या कामामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून लाखो रुपयांची देवाणघेवाण वनअधिकाऱ्यांमध्ये झाल्याचे बोलल्या जात होते. गोठणगाव वनपरिक्षेत्रांतर्गत गोठणगाव सहवनक्षेत्रात गट नं. २३१ मध्ये काम सुरू होते. पण लागूनच २ किमी अंतरावर कम्पार्टमेंट नं. २३७ मध्ये ख्वाजा गणी उस्मान हाजी दग्र्याला लागून सामूहिक शौचालय नसल्याने येथे येणारे भाविक यात्रेकरूसाठी मंजूर झालेले दोन शौचालये व दोन बाथरूम पुरुषासाठी तसेच दोन शौचालय व दोन बाथरूम महिलांसाठी मंजूर झाले. हे काम दग्र्याच्या उत्तर दिशेला लागून २५ मीटरवर खोदकाम सप्टेंबर २०१६ मध्ये सुरू झाले. ४-५ गडर व टाकीचे काम सुरू असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी काम बंद करण्यास लावले आणि हे काम होऊ शकले नाही. महाशिवरात्रीमध्ये दग्र्यामध्ये भाविकांची गर्दी असते. महिला व पुरुष यांना शौचालयासाठी जंगलाच्या आसऱ्याने उघड्यावर शौचास जावे लागते. यामध्ये लहान मुले व महिलांना त्रास होतो. शेकडो भाविकांना जंगलाच्या आसऱ्याने शौचास जावे लागते. एकीकडे शासन शौचालय बांधकामासाठी कोट्यवधी निधी खर्च करते. वर्ष २०१४ पासून केंद्र शासन व राज्य शासन स्वच्छता अभियान राबवित आहे. शौचालयाच्या प्रसार व प्रसिद्धीसाठी ही योजना राबवित आहे. परंतु अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. महादेव पहाडी पहिल्या पायरीवरून मूर्तीपर्यंत दीड किमी अंतरावर एकही शौचालय नाही. तसेच दग्र्याकडे ८०० मीटरवर शौचालय नसून वनअधिकारी व लोकप्रतिनिधी सर्व योजना कागदावरच राबवितात आणि या अभियानाचा बोरा वाजवितात. गावातील भक्तिनिवासजवळ ५-६ शौचालय बांधले असून येणाऱ्या लाखो भाविकांना शौचालय कमी पडतात. यामुळे भाविक उघड्यावर शौचास जातात. .