धोकादायक पुलावर सूचना फलक लावावेत- डॉ. संजीव कुमार

0
21

नागपूर, दि. 30 : पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्ते व पुल खराब होतात. वाहतूक योग्य राहत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विभागातील धोकादायक पुलावर ठळक  सूचना फलक लावावेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस यंत्रणांनी मिळून आवश्यक तिथे सुरक्षा कठडे लावण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिलेत. मान्सूनपूर्व  तयारीची सुरुवात  प्रशासनाने सुरु केली असून आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक आज विभागीय आयुकतांनी घेतली.
 विभागातील गडचिरोली सारख्या जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे  संपर्क तुटतो अशावेळी तिथे पावसाळ्यात पुरेल एवढ्या अन्नधान्याची तजवीज  संबंधित जिल्हा पुरवठा अधिका-यांनी करून ठेवावी. प्रत्येक जिल्ह्याने आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित साधन सामुग्री  तयार ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक इमारती व पुलांची पाहणी करुन अहवाल  जिल्हाधिकाऱ्यांना  द्यावेत.  नैसर्गिक आपत्ती  ओढवल्यास बल्क एसएमएस तात्काळ पाठविण्यात यावेत. एनडीआरएफ व एसडीआरएफ या यंत्रणांना आपत्ती कालावधीत पर्यायी रस्त्यांची माहिती  संबंधित जिल्हा प्रशासनाने द्यावी.
अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाल्यास मदत व पुनर्वसन प्रक्रियेशी सर्व संबंधित विभागांनी  सज्ज राहावे. आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नेमावा. त्या
अधिकाऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांकासह सर्व माहिती  जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षास द्यावी, असेही आयुक्तांनी सांगितले.
 यावेळी विभागातील  आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी करण्यात आलेल्या तयारीचे सादरीकरण  संबंधित आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी केले.