भंडारा : येत्या जून महिन्यात होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. त्यांची मागणी पक्षश्रेष्ठीसमोर मांडणार असल्याचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष स्वतंत्ररित्या लढले होते. त्यावेळी काँग्रेसच्या काही पदाधिकार्यांनी काँग्रेसविरुद्ध प्रचार केला. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांवर पराभवाची नामुष्की ओढविली होती. त्यामुळे काँग्रेसला नवसंजिवनी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागण्याची गरज आहे. त्यासाठी आपण मागील महिनाभरापासून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात दौरे करुन कार्यर्त्यांशी चर्चा करीत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी प्रचार केला त्यांची पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकार्यांना पदावरुन हटविण्याची मागणी केली होती, आता हा मुद्दा आम्ही रेटून धरणार असून पक्षविरोधी कारवाई करणार्या पदाधिकार्यांना पक्षातून निष्कासीत करण्याची मागणीही सेवक वाघाये यांनी प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हान, पक्ष प्रभारी मोहन प्रकाश यांना केली असल्याचेही वाघाये यांनी पत्रकात म्हटले आहे.