- जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये रांगोळी स्पर्धा
- शेकडो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
वाशिम, दि.01 : ‘मतदान करा, लोकशाही बळकट करा’, ‘मिळूनी अवघे सारे जण, चला करू मतदान’ असे संदेश देणाऱ्या रांगोळीचे रेखाटन करून विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्व पटवून सांगितले. निमित्त होते जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत आयोजित रांगोळी स्पर्धेचे.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांपर्यंत व परिसरातील मतदारांपर्यंत मतदार जागृतीचा संदेश पोहोचावा, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्ह्यातील शाळा व विद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आला होता.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, तसेच शासन अनुदानित माध्यमिक शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी या रांगोळी स्पर्धेत सहभागी आपल्या स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करून मतदार जागृतीचा संदेश देणारी रांगोळी रेखाटली. यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या रांगोळीतून मतदान हे आपला हक्क नव्हे तर कर्त्यव्य आहे, मतदानामुळे लोकशाही बळकट होईल, या आशयाचा संदेश देवून ‘व्होट फॉर बेटर इंडिया’ असे आवाहन केले.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे यांच्यासह सर्व गट शिक्षणाधिकारी, प्राचार्य व मुख्याध्यापक, शिक्षकांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.





