खताची लिंकिंग करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा- डॉ. दीपक सावंत

0
8

भंडारा दि. 7: जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्वाकांक्षी व प्राधान्य असलेला कार्यक्रम आहे. या अभियानासाठी आलेल्या निधीतून शिवारात पाणी झिरपावे अशी जनतेची अपेक्षा आहे. या निधीत कोणताही भ्रष्टाचार न करता ३१ मे २0१५ पर्यंत युद्धपातळीवर कामे पूर्णकरावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिल्यात.
जिल्हा परिषद सभागृहात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन व जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांना निर्देश दिलेत. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी, आमदार सर्वश्री अँड. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, कृषी सहसंचालक विजय घावटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर उपस्थित होत्या.
यावर्षी खरीप हंगामात खरीप भात पिकाची लागवड १ लक्ष ८0 हजार हेक्टर क्षेत्रात करण्याचे उद्दीष्ट आहे. मागील वर्षीपेक्षा यामध्ये २ हजार हेक्टर वाढ झाली आहे. त्याचबरोबर सिंचन क्षेत्रामध्ये १0 हजार हेक्टर वाढ झालेली आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर यांनी दिली.
वाढीव क्षेत्र लक्षात घेवून त्याप्रमाणात बियाणे व खताची मागणी नोंदवावी. त्याचबरोबर शेतकर्‍यांना पुरेसे खत उपलब्ध व्हावे यासाठी खताची लिंकिंग सिस्टम बंद करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी कडक कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या.कृषी विभाग योजनेचा नेमका किती शेतकर्‍यांना फायदा झाला. याची माहिती घेवून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी अहवाल सादर करावा. या योजनेत सुधरणा करावयाची असल्यास तशी शिफारस करावी.शेतकर्‍यांना या योजनेचा फायदा होण्यासाठी यामध्ये बदल करण्यास शासनाकडे निश्‍चित पाठपुरावा करू अशी हमी यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.शेतीसाठी लागणार्‍या विजेची किती मागणी आहे आणि किती पुरवठा केला जातो याचा अहवाल तयार करून तीन दिवसात सादर करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांना दिल्यात. महावितरणच्या कामकाजामध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात सिंचनाचे किती क्षेत्र वाढले याची नेमकी आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांनी प्रत्येक शेतकर्‍यांच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देवू असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर आमदार चरण वाघमारे यांनी सिंदपुरी तलाव फुटल्याने तेथील ५२ कुटूंब उघड्यावर आल्याची माहिती दिली.
या ५२ कुटूंबाच्या घरांचा प्रश्न मार्गी लागू लावू अशी हमी पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.या बैठकीला सूचना देवूनही जे अधिकारी गैरहजर होते त्यांच्यावर जिल्हाधिकार्‍यांनी कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्यात.या बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, दिलीप तलमले, जिल्हा कृषी विस्तार अधिकारी किरवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी देवगडे तसेच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.