गडचिरोली,दि.04 : जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी अजून पुढील दोन आठवडे महत्त्वाचे असून जिल्ह्यात १७ मे पर्यंत पूर्वीप्रमाणेच संचारबंदी लागू राहील. जीवनावश्यक वस्तू व सेवांबाबत नागरिकांनी काळजी न करता दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्त असून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणाहून जसे तेलंगणा, आंध्रप्रदेश, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या बाधित प्रदेशातून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मजूर कामगार मोठ्या संख्येने येत आहेत. राष्ट्रीय निर्देशाप्रमाणे आंतरराज्य/अंतरजिल्हयात अडकेलेले मजुर / नागरीक यांना स्वगावी जाणे संदर्भात हालचाली सुरु आहेत. तरी गडचिरोली जिल्ह्यात बाहेर राज्यातून बाधित मजुर किंवा नागरिक प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणून यापुढेही जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्याचे दृष्टिकोनातून यापुर्वीचे संचार बंदीबाबत निर्गमित केलेले सर्व आदेश दि. १७ मे पर्यंत कायम ठेवून, फक्त त्यामध्ये एस टी वाहतुक संदर्भात परवानगी देण्यात येत आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अखत्यारीतील बसेस सुरु करण्यात येवून कमाल प्रवास धारण क्षमतेच्या ५०% प्रवासी वाहतुक करण्याची परवानगी देण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अखत्यारीतील ५०% बस डेपो प्रवासी वाहतुक करण्याची परवानगी देण्यात येत आहे. हे आदेश दि.०३ मे २०२० रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील संचार बंदी बाबत ४ मे ते १७ मे पर्यंत नव्याने आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार पूर्वीप्रमाणेच जिल्ह्यात संचारबंदी विषयक सर्व आदेश लागू राहतील.





