24.3 C
Gondiā
Sunday, July 6, 2025
Home Blog Page 3

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात;एकाच कुटुंबातील चार जणांचा करुण अंत

0

एकाची प्रकृती चिंताजनक

वाशिम:-समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला, ज्यात नागपूरच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतक नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रहिवासी आहे. हे सर्वजण पुण्याहून नागपूरला परत येत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जैसवाल कुटुंब पुण्यात एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. गुरुवारी ते आपल्या कारने नागपूरकडे परत येत असताना, रात्री ९ च्या सुमारास वाशिम जिल्ह्यात त्यांच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला. गाडी अनियंत्रित होत महामार्गावर धडकली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. घटनास्थळावरच आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी अपघाताची नोंद घेत तपास सुरु केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, चालकाला डुलकी आली असण्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांनी पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन, तसेच गाड्यांची नियमित तपासणी, चालकांच्या विश्रांतीला महत्त्व देणे, यासारख्या बाबींकडे प्रशासनाचे आणि वाहनचालकांचे लक्ष असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या अपघातामुळे जैसवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या उमरेडमधील घरी शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शहरातील 62 जिर्ण इमारतींना मनपाची नोटीस

0

चंद्रपूर 4 जुलै – महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा संभाव्य धोका पाहता चंद्रपूर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरवात केली असुन मागील काही दिवसात 62 जीर्ण इमारतींना नोटीस देण्यात आली आहे.
पावसाळ्यात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारतींचा सर्व्हे करण्यात येतो. यात आढळलेल्या धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 चे कलम 264 अन्वये नोटीस जाहीर करण्यात येते. चंद्रपूर मनपातर्फे झोन 1 अंतर्गत 30, झोन 2 अंतर्गत 20 तर झोन 3 अंतर्गत 12 अश्या एकुण 62 धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात आली आहे.
नोटीसनुसार धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व व्यक्तींना व महत्वाचे साहित्य अन्यत्र सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरीत होण्यास सांगण्यात आले असुन त्वरित आपल्या इमारतीची दुरुस्ती करुन घेण्याचे तसेच त्यांनतर आपल्या इमारतीचे नोंदणीकृत स्ट्रक्चरल अभियंता यांचेकडून सर्वेक्षण करुन त्याबाबतचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट मनपा कार्यालयास सादर करण्यास कळविण्यात आले आहे.
अश्या 6 इमारती यापुर्वी मनपाने निर्लेखित केल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी सदर कारवाई दरवर्षी मनपातर्फे करण्यात येते मात्र काही मालमत्ताधारक जिवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. मग अश्या प्रसंगी निष्कासीत करण्याची अथवा नियमानुसार कारवाई मनपातर्फे करण्यात येते.

गोसेखुर्द धरणाची १३ वक्रद्वारे उघडली

0

भंडारा : भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु आहे. कुठे दमदार तर कुठे रिपरिप पाऊस सातत्याने कोसळत आहे. तसेच गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार दमदार व जिल्ह्यालगतच्या प्रदेशात अतिवृष्टी होत असल्याने गोसेखुर्द धरणाच्या ३३ द्वारांपैकी १३ वक्रद्वारे दि. ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी उघडण्यात आली. यामुळे काही प्रमाणात वैनगंगानदीच्या पात्रात पाणी वाढल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच गोसेखुर्द धरणाची १३ वक्रद्वारे अर्ध्या मिटरने उघडण्यात आली असून १३८५ क्युमेकस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. याशिवाय धापेवाडा धरणाची ७ द्वारे उघडली असून ८९०.९ क्युमेकस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वैनगंगा नदीची कारधा येथील धोक्याची पातळी २४५.५० मी असून सध्या पाण्याची पातळी ईशारा पातळीच्या खाली आहे. (Gosekhurd Dam) गोसेखुर्द धरणाची १३ वक्रद्वारे उघडल्यामुळे वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान,गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रण करिता दि.३ जुलै रोजी सायंकाळी ६.४५ वाजता १३ वक्रद्वारे खुली करून अंदाजे १३८५ क्यूमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दोन्ही जलविद्युत प्रकल्पांचा २०८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग पकडून एकूण अंदाजे १५९३ क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी पात्रात आवागमन करणार्‍यांनी तसेच नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.

आमगांव मुख्य रस्त्यांवर जनावरांचा ठिय्या!

0

आमगांव  : आमगांव नगरपरिषदेच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांवर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. परंतु सकाळपासून सायंकाळपर्यंत बसस्थानक चौक, गांधी चौक, कामठा चौक, आंबेडकर चौकातील मुख्य रस्त्यांच्या मधोमध गाई व पाळीव प्राण्यांनी आपला ठिय्या मांडल्याने वाहनचालकांना (Driver) कमालीचा त्रास होत आहे.आमगांव येथील या मुख्य रस्त्यांवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांचा (Animals) त्रास सहन करावा लागतो. पशुमालकांचे (Animal Owner) याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे हे प्राणी दिवसभर रस्त्याच्या मधोमध बसलेले असतात. वाहनचालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना (Principal) याबाबत माहिती दिली. परंतु आजपर्यंत, रस्त्याच्या मधोमध बसणाऱ्या पाळीव प्राण्यांवर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांनी त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आमगांव शहराच्या मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांच्या मालकांवर त्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी विनंती जनतेने केली आहे.

अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पारधी लाच घेतांना अटक

0

गोंदिया,दि.०४ः गोंदिया तालुका एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातंर्गत येत असलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती गुलाबो पारधी यांना सोमवार(दि.३०) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंदाजे ९०० रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे.सदर महिला अंगणवाडी पर्यवेक्षिकेला लाच घेतांना अटक करण्यात आल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने जिल्हा महिला बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय,जि.प.गोंदिया यांना पत्राद्वारे कळविण्यात आली असून संबधित विभागाने अंगणवाडी पर्येवेक्षिका श्रीमती पारधी यांच्यावर निलबंनाची कारवाई सुरु केली आहे.

एमपीएससीत रितिका दोनोंडेची उत्तुंग भरारी

0

गोंदिया,दि.०४ः सालेकसा तालुक्यातील साखरीटोला/सातगाव येथील रितिका प्रभाकर दोनोंडे हिने एमपीएससी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करून गावासह आईवडिलांचे नाव मोठे केले. त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मेहनत व जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे, हे रितिकाने राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करून सिद्ध केले. एमपीएससी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पीडब्लूडी विभागात वर्ग 2 पदी तिची नियुक्ती झाली आहे. या यशाचे श्रेय तिने वडील प्रभाकर दोनोंडे, आई मंजुषा दोनोडे आणि मार्गदर्शक शिक्षक व सततच्या अभ्यासाला दिले. निरंतर अभ्यासामुळेच ही मजल मारल्याचे एमपीएससी परीक्षा विजेती रितिका दोनोंडे हिने प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. भविष्यात गोंदिया जिल्हा व सालेकसा तालुक्यात काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच आवडेल. तसेच तालुक्याचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ग्रामपंचायतींना दिल्या प्रत्यक्ष भेटी

0
स्थानिक पातळीवर जनतेची कामे मार्गी लागण्यासाठी गाव पातळीवरील विविध कार्यालयांनी घेतली गती*
गावातील नागरिकांसमवेत संवादावर भर
नागपूर,दि.4: सर्वसामान्य लोकांना स्थानिक पातळीशी निगडीत असलेल्या अडचणींवर गावातच मात करता यावी, त्यांच्या अडचणी गावपातळीवरच निकाली निघाव्यात यासाठी गाव पातळीवरील कार्यालयांनी गती घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दररोज झालेल्या कामांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने निश्चित केल्या प्रमाणे पहिला बुधवार व इतर दिवशी ग्रामपंचायत व तलाठी साजा कार्यालयात संबंधित अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष हजर राहून लोकांच्या तक्रारी मार्गी लावत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज मौदा तालुक्यातील पावडदौना, कामठी तालुक्यातील गुमथळा व इतर गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून समाधान केले.
*पंधरा दिवसात अर्ज निघतील निकाली*
तुमचे प्रश्न गावातच निकाली निघावेत यासाठी अनेक उपक्रमासमवेत समाधान दिवस हा आपण सुरु केला आहे. महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी प्रत्येक गावातील संबंधित अधिकारी हे गावातच उपलब्ध असल्याने त्या अर्जाबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल. पहिल्या बुधवारी आलेल्या अर्जाचा निपटारा हा तिसऱ्या बुधवारी म्हणजेच पंधरा दिवसाच्या कालावधीत मार्गी लागेल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुमथळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या बैठकीत सांगितले. या बैठकीस सरपंच शिलाताई वांगे, उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, तहसीलदार दत्तात्रय निबांळकर, मंडळ अधिकारी राहूल भुजाडे, तलाठी प्रतिक्षा पाटील, ग्रामसेवक अंकिता चकोले आदी उपस्थित होते.
*खोट्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत*
समाधान दिवसाच्या माध्यमातून गाव पातळीवरील प्रशासनाला अधिक कर्तव्य तत्पर व गतिमान केले जात आहे. यात नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्तम आहे. तथापी काही गावांमध्ये जाणीवपूर्वक ब्लॉकमेल करण्याच्या उद्देशाने खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.
पावडदौना येथे आयोजित समाधान दिवसात दहा तक्रारी प्राप्त झाल्या. यात आठ महसूल व दोन कृषी विभागाशी निगडीत आहेत. त्याचे निराकरण केल्या जात आहे. समाधान दिवसाच्यानिमित्ताने या ठिकाणी आरोग्य शिबीराचेही आयोजित करण्यात आले होते. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राज्यात गेल्या अडीच वर्षात ४२७ पोलीसांचा मृत्यू;२५ पोलीसांनी केली आत्महत्या

0
file photo

७५ पोलीसांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दर मंगळवारी आणि शुक्रवारी दोन तास कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा-मुख्यमंत्री

मुंबई:-राज्यात गेल्या अडीच वर्षांत ४२७ पोलिसांचा मृत्यू झाला असून यात २५ आत्महत्यांचा समावेश आहे. ७५ पोलीसांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांमध्ये वाढत असलेल्या मानसिक तणावामुळे ही स्थिती उद्भवली असल्याचे स्पष्ट होताच राज्य सरकारने तातडीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील प्रत्येक पोलिस युनिटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता दर मंगळवारी आणि शुक्रवारी दोन तास कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा लागणार आहे. आठवड्यात किती पोलिसांशी संवाद झाला याची नोंद ठेवण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली.

ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या ड्यूटीदरम्यान होणाऱ्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था व डीजी लोन आदी प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले. पोलिसांच्या ड्यूटीचा ८ तासांचा कालावधी असला तरीही किमान १२ तास त्यांना काम करावे लागते. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक पोलिस मुंबईबाहेर वास्तव्यास आहेत. वसई, विरार, नवी मुंबई, पनवेलपासून कर्जत, कसारापर्यंत पोलिसांचे वास्तव्य आहे. यामुळे दिवसातील किमान १६ ते १८ तास त्यांचे ड्यूटी व प्रवासात जातात. त्यामुळे योगा आणि व्यायाम करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. पोलिसांचे सर्वाधिक मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने होत आहेत.

गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, मुंबई व महाराष्ट्र पोलिस दलात गेल्या काही वर्षांत हृदयविकार, कर्करोग, आत्महत्या अशा विविध कारणांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले. यात कार्डियाक अरेस्टमुळे ७५ मृत्यू, कर्करोगामुळे ६ मृत्यू झाले आहेत. पोलिसांच्या कल्याणासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत असून यात ४० प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. यासाठी राज्यात २७० हॉस्पिटल्ससोबत टायअप केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, राज्य शासनाच्या १५० दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरतीसंदर्भातील सर्व प्रकरणे मिशन मोडवर निकाली काढली जातील. यासाठी सर्व विभागांना यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत.

विठ्ठल दर्शनासाठी खामगावहून ‘हरीभक्तांची’ रेल्वे पंढरपूरकडे रवाना

0
केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी
बुलढाणा,दि. 4  : आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सोयीसाठी आज खामगाव येथून ‘विठ्ठल दर्शन एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वे मोठ्या जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे रवाना झाली. या पहिल्या फेरित एकूण १६२९ भाविक सहभागी झाले होते. रेल्वेला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते खामगाव रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, सागर फुंडकर उपस्थित होते. या वारकऱ्यांना खामगावकरांनी ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’च्या गजरात हजारोंच्या संख्येने निरोप दिला.
स्टेशन परिसरात भक्तीरसात न्हालेली गर्दी, टाळ-मृदुंगाच्या गजरात गाणारे वारकरी, व विविध संघटनांकडून करण्यात आलेले अल्पोपहार व पाण्याचे वाटप यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने न्हालेला होता. गेल्या सात वर्षांपासून खामगावहून आषाढी एकादशीसाठी ही विशेष रेल्वे सेवा सुरु असून यंदाही बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या पहिल्या फेरितून विभागाला ६ लाख ३२ हजार ३५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असून यामध्ये सर्वसाधारण, राखीव व वातानुकूलित तिकिटांचा समावेश आहे. या पवित्र यात्रेच्या आयोजनासाठी व व्यवस्थापनासाठी स्थानिक, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांचे योगदान उल्लेखनीय होते.

देवरी येथे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा सभा

0

देवरी,दि.4 जुलै – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील सभागृहात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा सभा संपन्न झाली.सदर आढावा सभेत जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे उपस्थित होते.आढावा सभेत देवरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सहायक,आरोग्य सहयिका,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा गट प्रवर्तक, तालुका स्तरीय कर्मचारी उपस्थित होते.

आढावा सभेत जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी माता व बाल मृत्यु टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे त्यात किशोरावस्थापासुनच त्यांच्या विविध तपासणी सोबत गरोदर मातेचे बारा आठवड्याच्या आत नोंदणी,लोह,रक्तक्षय व कँल्शियम यांची मात्रा लाभार्थ्यांना देणे,वेळेत लसीकरण व फॉलोअप ठेव्ण्याच्या सुचना दिल्या.आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली(एच.एम.आय.एस.) ,एकात्मिक आरोग्य माहिती मंच आय.एच.आय.पी. ऑनलाइन पोर्टल,फॅमिली प्लॅनिंग लॉजिस्टिक मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एफ.पी.एल.एम.आय.एस.)ॲप कुटुंब नियोजन वस्तूंचा साठा व्यवस्थापित करणेमागणी करणे आणि जारी करणे यावर मार्गदर्शन केले.DHIS2 आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली,यू-विन पोर्टलवरून गरोदर माता आणि बाळाची लसीकरणाची नोंद ऑनलाइन पोर्टल अद्यावत करणे, यू-विन पोर्टल अंतर्गत लाभार्थ्यांच्या लसींची रिअल-टाइम एन्ट्री नियमित करणे.

एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) हे साथीचे रोग तसेच इतर आरोग्यविषयक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करण्यासाठी महत्वाचे पोर्टल असुन सर्व आरोग्य संस्थानी एस,पी व एल.फॉर्म दैंनदीन भरण्याच्या सुचना दिल्या.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण  यांनी पावसाळ्यात जलजन्य व किटकजन्य आजार जसे हिवताप व डेंग्युची रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांचे नियमित गृहभेटी सर्वेक्षण,डासांची पैदास रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतीचे उपाययोजनागावात आरोग्य कर्मचार्यामार्फत करण्यात येणारे प्रतिबंधात्मक उपाययोजना, जैविक बाबी,प्रौढ डास व अळी कमी करण्याचे विविध पद्धती,मलेरियाच्या डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी उपाययोजना,नवीन आणि उपचारांच्या पद्धती विषयी मार्गदर्शन करणे,डासअळी नाशक पद्धती अशा विविध बाबींचा आढावा याप्रसंगी घेवुन मार्गदर्शन केले.आढावा सभा यशस्वीतेसाठी देवरी तालुका आरोग्य सहाय्यक वरखेडे, संगणक परिचालक शहारे यांनी विशेष प्रयत्न केले.