
जनप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष
गोंदिया : शहरातील सुर्याटोला येथील रेल्वे लाईनजवळील गटर योजना व रेल्वे भिंती आवारभिंतीचा मलबा पडून आहे. यामुळे रस्ता अवरूध्द झाला असून वाहतूक करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिवाय रस्त्यावर मलबा येत असल्याने अपघातही वाढले आहेत. या प्रकाराकडे नगर परिषद प्रशासन व रेल्वे प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. परिणामी नागरिकांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे. याकडे स्थानिक जनप्रतिनिधीही डोळेझाक करीत असल्याने परिसरात समस्या वाढल्या आहेत.
सुर्याटोला परिसर अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. जनप्रतिनिधी व नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने समस्या आणखीच वाढली आहे. या भागात गटार योजनेच्या दुसर्या टप्प्याचे काम होत आहे. परंतु, सदर काम नागरिकांच्या जीवावर उठले आहे. स्थानिक रहिवासी वंजारी यांच्या घरापासून बब्बाभाऊ (मच्छीवाले) यांच्या घरापर्यंत मागील पंधरवड्यापासून गटर योजनेचे काम व रेल्वे आवाराच्या भिंतीचा मलबा रस्त्यावर पडून आहे. या मलब्यामुळे घंटा गाडी, दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अपघाताला खुले आमंत्रण देणारी ही परिस्थिती निर्माण झाली असतानाही संबंधित प्रशासन व तथाकथित जागरूक जनप्रतिनिधी मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. तात्काळ मलबा हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.
तर वर्दळ करावी कशी?
गटार योजनेचे काम आधीच शहरवासीयांसाठी तापदायक ठरले आहे. त्यात भर म्हणून सुर्याटोला परिसरात खोदकाम करून मलबा रस्त्याच्या कडेलाच पडून आहे. यात रेल्वेच्या आवारभिंतीच्या मलब्याची भर पडली आहे. यामुळे अर्धा रस्ता मलब्याने व्यापला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रस्त्याचा शोध घ्यावा लागत आहे. या प्रकाराने नागरिकांनी रहदारी करावी कुठून? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. मलबा उचलून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी केली जात आहे.





