तिरोडा : शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार युवकांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने गुरुवारी (दि. १३) येथील मुख्य चौकात धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. या मागण्यांची पूर्तता न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.माजी आ. दिलीप बन्सोड, तालुकाध्यक्ष रमेश टेंभरे, राधेलाल पटले, राजेशकुमार टेंभेकर, संध्या गोसाई, देवानंद गोसाई, वाय.टी. कटरे, ओम पटले,अरविंद येडे, जनकलाल लिल्हारे, शिवप्रसाद यादव, सुदाम सुरुसाऊत, क्रिश चौधरी, मानिक झंझाड, बाबुलाल लिल्हारे, वनिता ठाकरे, गोविंद ठाकरे, रमेश पिंपळकर आदींचा समावेश होता.
यावेळी दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करावे, सन २००६ ते २००८ पासून कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना कर्ज माफीचा लाभ द्यावा, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १०० टक्के प्रोत्साहान अनुदान देण्यात यावे, धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस त्वरित देण्यात यावा, रासायनिक खताच्या किमती नियंत्रणात ठेवाव्या, वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई त्वरित देण्यात यावी, मनरेगाच्या प्रलंबित सर्व कामे पूर्ण करण्यात यावी, बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उभारण्यासाठी एमआयडीसी येथे जागा उपलब्ध करुन द्यावी, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान त्वरित देण्यात यावे.





