25.9 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home महाराष्ट्र गुंडाच्या मदतीने निवडणूक जिंकणं काळ्या पैशापेक्षा वाईट – उद्धव ठाकरे

गुंडाच्या मदतीने निवडणूक जिंकणं काळ्या पैशापेक्षा वाईट – उद्धव ठाकरे

0
20

मुंबई, दि. २० – आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील महापालिका व पचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात अनेकांनी प्रवेश केला आहे. त्यामध्ये पुण्यातील कुख्यात गुंड विठ्ठल शेलारचाही समावेश असून याप्रकरणी बरीच टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘ सामना’च्या अग्रलेखातून भाजपावर टीका केली आहे. ‘ गुंडांना सत्ताधाऱ्यांची कवचकुंडले हवीच असतात व अशा गुंडांच्या मदतीने निवडणूक जिंकणे व पक्षाची व्याप्ती वाढविणे हे काळे धन जमा करण्यापेक्षा वाईट आहे. असे सर्व दाखलेबाज लोक कालपर्यंत राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली होते. ते सगळे एका रात्रीत ‘कमल निवासा’त विराजमान झाले. सत्तेचा तीळगूळ सगळय़ांनाच हवा असतो, पण भाजपने आपली कवळी सांभाळून असे राजकारण करावे’ असा सल्ला उद्धव यांनी दिला आहे.
भारतीय जनता पक्ष हा अजून तरी आमचा मित्रपक्षच आहे. त्यामुळे आम्ही त्यांना नेहमीच सुयश चिंतीत आलो. उंचे लोग उंची पसंद असे त्यांच्याविषयी म्हटले जात असेलही, पण राजकारणात जो तो आपापले पत्ते पिसत असतो व फेकत असतो. सध्या शिवसेना-भारतीय जनता पक्षात जागावाटपावरून चर्चेच्या फेऱया झडत आहेत. काही लोक या फेऱ्यांना ‘गुऱ्हाळ’ म्हणत असले तरी या गुऱ्हाळातून ‘मळी’ निर्माण होणार नाही तर गुळाचाच गोडवा राहील असे वाटते, पण सत्ताधारी पक्ष असल्यामुळे सध्या अनेक लोक त्यांच्या दारात तीळगुळासाठी उभे आहेत व दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत तीळगूळ भरवण्याचे ‘गोड’ कार्यक्रम सुरू आहेत. भारतीय जनता पक्ष हा साधनशूचिता वगैरे मानणाऱ्यांपैकी असल्याचे अनेक वर्षे बोलले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, मुलायमसिंगांचा समाजवादी पक्ष, लालू यादवांचा राष्ट्रीय जनता दल, ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस हे पक्ष भ्रष्ट, टाकाऊ, चारित्र्यहीन, गुंडांचे पक्ष म्हणून त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी भाजपने सोडलेली नाही. देशाच्या राजकारणाची गढूळ गंगा कोण शुद्ध करील तर तो भारतीय जनता पक्षच. राजकारणातील गढूळ प्रवाह नष्ट करून शुद्ध चारित्र्याचे, गुंड-झुंड मुक्त असे राजकारण कोण करेल तर तो फक्त सध्याच्या मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच, असे लोकांना वाटत होते. पण तीळगुळात मिठाचा खडा यावा किंवा दगड येऊन दात कचकन पडावा असे प्रकार घडू लागले आहे