
नाशिक, दि. 10- ज्या सरकारच्या राज्यात शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात, असं सरकार काय कामाचे? असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. गेल्या तीन वर्षामध्ये साडेचार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. तरिही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती का दिली जात नाही ? असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच जुलै महिन्यात शिवसेना भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून आता शिवसेना आणि भाजप यांच्यातला लढा महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. नाशिकमधील शिवसेनेच्या संपर्क अभियानात संजय राऊत बोलत होते. आपली लढाई आता मित्रपक्षासोबत आहे, असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
भाजपकडून शिवसेनेला संपवण्यासाठी अनेक चाली खेळल्या जात आहेत, पण तसं होणार नाही. जुलै महिन्यात आपल्या अस्तित्त्वासाठी आपण सर्वात मोठी लढाई लढणार आहोत. असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तसंच समृद्धी महामार्गावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडल्या जात आहेत. पण समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.





