25.5 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ शिवरायांना अभिप्रेत सुराज्य निर्माण करू-मनोहर चंद्रिकापुरे

शिवरायांना अभिप्रेत सुराज्य निर्माण करू-मनोहर चंद्रिकापुरे

0
38

सडक अर्जुनी,दि.21 : प्रखर बुद्धिमता, अलौकिक शौर्य, तेजस्वी बाणा, चातुर्य, युक्तिवाद या गुणांनी शिवरायांनी आदर्श राज्य निर्माण केले. आजही देशविदेशात महापराक्रमी आदर्श जाणता राजा म्हणून शिवरायांचे गुणगान होत असून सर्वत्र शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन होत आहे. त्यांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र आणून धर्मनिरपेक्ष, एकसंघ सुराज्य निर्माण केले. परंतु आज जाती-धर्माच्या नावावर वाद निर्माण होत आहे. देशातील स्थिती गंभीर होत आहे. आज राज्यकर्ते नावापुरता शिवरायांचा वापर करीत असून त्यांच्या कथनी आणि करणीत विसंगती दिसत आहे. अशा स्थितीत देशाला एकसंघ ठेवण्यासाठी आपसातील हेवेदावे विसरून शिवरायांचा खरा इतिहास आत्मसात करून एकत्र येऊ. शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.

राजे ग्रुप घोटीद्वारा शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवस्मारकाचे भूमिपूजन याप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर चंद्रिकापुरे होते. जि.प.चे गटनेते गंगाधर परशुरामकर, डॉ. अविनाश काशिवार, राजेश नंदागवळी, शेषराव गिऱ्हेपुंजे,माजी जिप उपाध्यक्ष छाया चव्हाण, सरपंच दिनेश कोरे, राजू पटले, हेमराज कोरे, योगराज मुनेश्वर, सुधाकर ब्राह्मणकर, लिलाधर कोरे, विजय हेमणे, राजकुमार ब्राह्मणकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात पुलवामा येथील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. याप्रसंगी जि.प. गटनेते गंगाधर परशुरामकर, काँग्रेसचे नेते राजेश नंदागवळी, शेषराव गिऱ्हेपुंजे यांनी मार्गदर्शन केले. .प्रास्ताविक सरपंच दिनेश कोरे यांनी केले. संचालन प्रदीप ब्राह्मणकर यांनी केले. आभार अजय मुनेश्वर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजे ग्रुप व घोटी येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केले.