वाशिम, दि. ०8 : जिल्ह्यातील मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक तसेच सामाजिक क्षेत्रात मातंग समाजासाठी मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांना राज्य शासनामार्फत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार दिला जातो. सन २०१९-२० करिता या पुरस्कारासाठी पात्र संस्था व व्यक्तींनी विहित नमुन्यातील प्रस्ताव तीन प्रतीत ३० मार्च २०१९ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांच्या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
वयवर्षे ५० पूर्ण असलेले पुरुष तसेच वयवर्षे ४० पूर्ण केलेल्या महिला समाजसेवक या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करू शकतात. मात्र त्यांना समाज कार्यातील किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच शिक्षण, आरोग्य, अंधश्रद्धा निर्मुलन, जनजागरण आदी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व समाज कल्याण क्षेत्रातील १० वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेल्या नोंदणीकृत सामाजिक संस्था सुध्दा या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास पात्र आहेत.
प्रस्तावासोबत चारित्र्यविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा दाखला, स्वतःची अलीकडील २ छायाचित्रे, वृत्तपत्र कात्रणे, समाज कार्याची माहिती व इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अर्जाचा विहित नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम येथे विनामुल्य उपलब्ध आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी विहित अर्जाचा नमुना प्राप्त करून घेता येईल, तसेच प्रस्ताव सादर करता येतील. ३० मार्च २०१९ नंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा विचार पुरस्कारासाठी केला जाणार नाही, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे





