तुमसर,दि.05ः-तालुक्यातील खंबाटा/माडगी येथील मॅग्नीज शुद्ध करणाèया युनिव्हर्सल फेरो (खंबाटा) कारखान्याचे तब्बल २०० कोटी रूपयांचे वीज बील शासनाने अभय योजनेंतर्गत माफ केले होते. त्यानंतरही हा कारखाना सुरू झाला नाही. करारभंगाची दखल घेत या प्रकरणाची लवकरच चौकशी होणार असल्याची माहिती आहे. तुमसर जवळ युनिव्हर्सल फेरो (खंबाटा) हा मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना आहे. परंतू गत १७ वर्षांपासून बंद आहे. या कारखान्याचे सुमारे दीड हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. कारखाना सुरू करण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले. त्याअंतर्गत साडेतीन वर्षापूर्वी राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाने पुढाकार घेत आजारी कारखान्याचे वीज बील अभय योजनेंतर्गत माफ केले होते. त्यात तुमसरच्या युनिव्हर्सल कारखान्याचा समावेश होता.वीज बील माफ करतांना कारखाना सुरू करण्याची अट होती. अटीच्या अधीन राहूनच वीज बील माफ करण्यात आले होते. परंतू तीन वर्षांनंतरही कारखाना सुरू झालेला नाही. ऊर्जा विभागाने कराराचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयात याचीका दाखल आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. कारखाना सुरू करण्यासाठी यापूर्वी शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष इंजि. राजेंद्र पटले यांनी मोठे आंदोलनकेले होते. परंतू त्यानंतरही कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. आज येथील कामगार बेरोजगार झाले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने बेरोजगार व कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने संबंधित विभागात खळबळ उडाली आहे. आता कोणती कारवाई होते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.





