नागपूर,दि.16: : मुख्यमंत्र् यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत करावी असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानभवन परिसरात व्यक्त केले.यावेळी त्यांच्यासोबत भंडारा-गोंदियाचे विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके हे सुध्दा उपस्थित होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसताना त्यांनी राज्यातील अनेक भागांचा दौरा करून शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये द्यावे, अशी मागणी केली होती. पण ते आता खुद्द मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यांनी केलेली मागणी प्रत्यक्षात आणून शेतकऱ्यांना मदत करावी असे ते पुढे म्हणाले.देशात संवेदशनशील विषय गाजत आहेत. राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याविषयी केलेले वक्तव्य निंदनीय आहे. त्याचा निषेध करण्याची मागणी आम्ही सभागृहात सभापतींकडे केली होती. पण आमची मागणी त्यांनी फेटाळून लावली. त्याचा निषेध म्हणून आम्ही सभागृहाचा त्याग केला आहे.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय, या देशात माझेच विचार चालतील’ राष्ट्रवादीची फलकबाजी
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर येथे प्रारंभ झाला आहे. आज पहिल्याच दिवशी राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील विधानावरुन येथे भाजपा आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी भाजपाला उत्तर दिले आहे. हातात एक फलक घेऊन त्यांनी एकट्याने वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजपानं हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक भूमिका घेतली. भाजपा आमदारांनी ‘मी पण सावरकर’ असलेल्या टोप्या घालून विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.दरम्यान, आंदोलन करणाऱ्या भाजपाला उत्तर देण्यासाठी आमदार प्रकाश गजभिये यांनी एकट्याने आंदोलन केले. यासाठी त्यांनी हातात एक छोटा फलक घेतला होता. त्यावर “म. गांधींचा खून मी केला. मी नथुराम गोडसे बोलतोय. या देशात माझेच विचार चालतील” असा मजकूर लिहिला होता.या फलकबाजीद्वारे त्यांनी भाजपाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हातात फलक घेऊन एकट्याने आंदोलन करतानाचा फोटो व्हायरल झाला असून त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.





