
मुंबई,दि.23(वृत्तसंस्था). लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे सरकार वारंवार सांगत असतानाही नेहमी सकारात्मक असलेले मुंबईकर या नियमाची पायमल्ली करून मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच केंद्रीय पथकानेही मुंबईची स्थिती पाहाता १५ मे पर्यंत येथील कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाख ५६ हजारांपर्यंत जाऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईकरांसाठी ही धोक्याची सूचना असून आतातरी मुंबईकर लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करतील अशी अपेक्षा आरोग्य विभागातील अधिकारी व्यक्त करीत आहेत.
मुंबई आणि पुण्यात लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या दोन्ही ठिकाणी लॉकडाऊनचे शिथिल केलेले नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि कठोर लॉकडाऊनचे पालन करावे असे निर्देश दिले. केंद्राचे विशेष पथक बुधवारी सकाळी मुंबईत पाहणी करण्यासाठी दाखल झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह या पथकाने धारावीला भेट दिली. पाहणीनंतर पथकाने, मुंबईत ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढतेय, त्या गणिताच्या आधारे ३० एप्रिलपर्यंत मुंबईत ४२ हजार ६०४ रुग्ण असतील आणि १५ मेपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाख ५६ हजारांपर्यंत जाऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही मंगळवारी बोलताना १ ते १५ मे या दरम्यान महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, काही तज्ञानुसार लाेकांनी नियमांचे पालन केल्यास हा आकडा कमी होऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले आहे.





