
श्रीनगर(वृत्तसंस्था)दि.03. भारत-पाकिस्तान सीमेवर हंदवाडा येथे शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या चकमकीत सैन्याच्या 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आशुतोष शर्मासहित 5 जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे, नॉर्थ काश्मीरमधील एका घरातील कुटुंबाला दहशतवाद्यांनी बंदी बनवले होते, त्यांना वाचवण्यासाठी सैन्य आणि पोलिसांची टीम गेली होती. घरातील सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्चक्री सुरु होती. एएआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.
शहीद झालेल्यांमध्ये कर्नल आशुतोष शर्मा व्यतिरिक्त मेजर अनुज, सब इंस्पेक्टर शकील काजी, एक लान्स नायक आणि एक रायफलमॅन आहे. ही चकमक हंदवाडाच्या छांजीमुल्लाह गावात शनिवारी दुपारी 3 वाजता सुरु झाली होती. 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा यांना मागील वर्षीच दुसऱ्यांदा सेना मेडल मिळाले होते.
5 वर्षानंतर दहशतवाद्यांच्या चकमकीत कमांडिंग ऑफिसर शहीद
> सैन्याने जम्मू-काश्मिरमध्ये पाच वर्षांनंतर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरला गमावले. याआधी 2015 मध्ये कुपवाडाच्या हाजीनाका जंगलात झालेल्या चकमकीत 41 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. ते महाराष्ट्रातील रहिवासी होते. कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती 2017 मध्ये सैन्यात दाखल झाली.
> 27 जानेवारी 2015 रोजी 42 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एमएन राय काश्मिरच्या त्रालमध्ये चकमकीत शहीद झाले होते. कर्नल राय गोरखा रेजिमेंटमधून होते आणि उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून होते. त्यांना मरणोत्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले.
> काश्मीरचे कोर कमांडर राहिलेले निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांच्या म्हणण्यानुसार मी या शूर माणसांच्या बलिदानास अभिवादन करतो. एकीकडे दु: ख असले तरी दुसरीकडे गर्व आहे.





