गोंदिया,दि.04-गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या कटंगी धरण संकुलात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील रहिवासी संपत वलथरे (४८) व घनश्याम वलथरे (३२) अशी मृतांची नावे आहेत.
कटंगी येथे शेताजवळील कुंपणाला विद्युत प्रवाह जोडून जनावरांची शिकार करण्याची योजना या दोघांनी आखली होती. त्यांनी विद्युत प्रवाह घेण्याकरिता शेताजवळील उघड्या रोहित्राचा उपयोग करायचे ठरवले. मात्र, रोहित्रातून वीज घेताना त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज गोरेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुसारी यांनी वर्तविला आहे. ही घटना गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथे ४ जानेवारीला सकाळी ही घटना घडली आहे. मध्यम प्रकल्पाच्या ठिकाणी लागलेल्या विजवितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर हे उघडे असल्याचे दिसून आले आहे. सकाळी दोन तरुणाचा मृतदेह कटंगी येथे शेताजवळील परिसरात असल्याची माहिती मिळाली. विद्युत विभागाच्या दोन लाईनमननी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता मृतांनी जनावरांच्या शिकारीकरिता रोहित्रात आकोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाच विजेचा धक्का बसल्याचे दिसून येते, अशी माहिती महावितरणचे अभियंता विनीत वाहने यांनी दिली.