इतकी वर्षे खरंच मी निगरगट्टासारखा पाहत हाेताे

0
19

नागपूर दि. ११: शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा ज्वलंत प्रश्न आहे. यावर राजकारण करणे, टीका करणे हे काम विरोधी पक्षांनी करावे. परंतु एक माणूस म्हणून जगताना हालअपेष्टेत दिवस काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे जास्त महत्त्वाचे आहे. हे सर्वच आपल्या सामाजिक कुटुंबाचा भाग आहे व त्यांना स्थैर्य देण्यासाठी संवेदनेतून माणुसकीची ‘मशाल’ जागवलीच पाहिजे असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. ‘मी इतकी वर्षे निगरगट्टासारखा, निर्लज्जपणे हे सारे पाहत होतो. आता असह्य झाले म्हणून आलोय. मला माझीच किळस वाटतेय. अगदी वाईट शब्दांत सांगायचे तर इतकी वर्षे कुठे झक मारत होतो, हे मलाच कळत नाही. मी माझ्या कोशातच वावरत होतो. माझ्याच संवेदना बोथट झाल्या असतील तर काय?’. .अशी प्रांजळ कबुली प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी साेमवारी दिली.‘जनमंच’तर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी ‘एका साध्या सत्यासाठी…’ या आर्थिक सहायता कृतज्ञता उपक्रमाचे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी भावुक झालेल्या नाना यांच्या आवाहनाने संपूर्ण सभागृहदेखील हळवे झाले.

शेतकरी आत्महत्यांवर बैठका व चर्चा फार होतात. परंतु चर्चा व संवाद यात वेळ न घालवता संवेदनशील मनाचे कलाकार नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी समोर येत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी निधी जमा केला व तो त्यांना सुपूर्ददेखील केला. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला मकरंद अनासपुरे, शेतकरी नेते किशोर तिवारी, ‘जनमंच’चे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, दिग्दर्शक हरीश इथापे, ज्येष्ठ पत्रकार श्याम पेठकर, नितीन नेरुरकर, शरद शेलार, ‘जनमंच’चे सचिव राजीव जगताप हे व्यासपीठावर उपस्थित होते.

‘शहरात १५ हजारांंचा बूट, पाच हजारांचा शर्ट घेणारे लोक आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी १,५०० रुपयांची मदत दिली जाते. खर्च पाहिला तर ३० हजार रुपये. शेतकरी विधवांची ही अवस्था पाहिल्यावर मलाच अपराधी वाटते. त्या भावनेतूनच अपराध फेडण्याचे प्रयत्न करतो आहे. आम्हाला काही राजकारणात जायचे नाही. आम्ही वरूनच निवडून आलोय. ही माणुसकीची मशाल अशीच पेटवत ठेवयाची आहे,’ अशा भावना अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केल्या.

यापूर्वीच्या सरकारनेही शेतकऱ्यांना मदत केली. पण मधल्या मध्ये ती गायब झाली. त्यामुळे मधल्या माणसाची मानगूट आम्ही कधी धरणार? ती धरायची की नाही?.. आरोप अजून सिद्ध झाले नाहीत म्हणून निर्लज्जासारखे काही माजी मंत्री कोट्यवधीची मालमत्ता घेऊन बसले आहेत. त्यांना हे कसं दिसत नाही? अशा संतप्त भावनाही नाना यांनी बोलून दाखवल्या.

६२ कुटुंबीयांना मदत
नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने गोळा झालेल्या निधीतून यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील ६२ शेतकरी विधवांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. जनमंच या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने नागपुरात या कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. ‘एकाच वेळी माझ्या इतक्या मुली विधवा झाल्या असे वाटते. माझ्या जावयाने आत्महत्या केल्यावर घरी आलेल्या मुलीला मी बघू शकलो असतो काय? असा प्रश्न मला पडतो. अर्थात त्यासाठी ती माझीच मुलगी असायला हवी काय? असेही वाटते,’ हे सांगताना नानांचा कंठ दाटून अाला.