नवी दिल्ली : गोंदिया येथील युवा जागृती संस्था आणि मुंबई येथील कड्ल्स फाउंडेशन या संस्थांना बालकांकरिता केलेल्या उत्तम सेवेसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाच्या वतीने बालकदिनानिमित्त राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते विविध श्रेणीत राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बालकल्याण विकासमंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते २0१५ चे राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आले. गोंदिया येथील युवा जागृती संस्थेचे प्रमुख गोपाल अग्रवाल यांना यावेळी राष्ट्रीय बालकल्याण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ३ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अग्रवाल यांच्यासह मुंबई येथील कड्ल्स फाउंडेशनचाही सन्मान करण्यात आला. संस्थेच्या संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुरोनीता दत्ता बहल यांनी पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्रातील या संस्थांसह देशातील ५ संस्था आणि ३ व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अग्रवाल यांनी १९७४ पासून युवा जागृती संस्थेच्या माध्यमातून आजपयर्ंत बालकांच्या विकासासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. युवा जागृती संस्थेच्या माध्यमातून शेकडो मुलांची पोलिओ शस्त्रक्रिया, मुलांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया, तिरळेपणाची शस्त्रक्रिया नि:शुल्कपणे करण्यात आली. लहान मुलांचे जन्मत: किंवा अपघाताने फाटलेले ओठ व टाळूंची नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्याचे कार्य? संस्थेने केले आहे. बालकांच्या पोषण आहारासाठी कार्य करणार्या कड्ल्स फाउंडेशनचा राष्ट्रीय सन्मान यावेळी झाला. मुंबईतील लोअरपरेल भागात कड्ल्स फाउंडेशनची स्थापना २0१२ मध्ये झाली. ही संस्था कर्करोगाने ग्रस्त बालकांसाठी समग्र पोषक आहार पुरविण्याचे कार्य करीत आहे. संस्थेच्या या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही संस्था देशातील ११ इस्पितळातील गरजू मुलांसाठी पोषक आहार पुरविण्याचे कार्य करीत आहे. इस्पितळांमध्ये तज्ज्ञांच्या माध्यमातून बालकांच्या पोषक आहाराबद्दल विविध मार्गदर्शन शिबिरही आयोजित करते.





