महाराष्ट्रातील 10 हजार 770 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषीत

0
8

सिंधुदूर्ग,सातारा, रत्नागिरी आणी कोल्हापूर हे जिल्हे हागणदारीमुक्त -पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर

मुंबई दि. 26 : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 10 हजार 770 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषीत झाल्या असून सिंधुदूर्ग नंतर आता नुकतेच सातारा,
रत्नागिरी आणि कोल्हापूर हे जिल्हे हागणदारीमुक्त घोषित झालेले आहेत अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

श्री.लोणीकर पूढे म्हणाले, देशात दुसऱ्या क्रमांकावर गुजरात (6324) तर तिसऱ्या क्रमांकावर उत्तराखंड (5608) राज्य आहे. तर महाराष्ट्रातील 59 तालुके देखील हागणदारीमुक्त घोषित झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाची घोषणा केली. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र ग्रामीण स्वच्छतेत प्रचंड वेगाने पुढे जाताना दिसत आहे.

या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या घोषणेपासूनच राज्यात सुक्ष्मनियोजन करण्यात आलेले आहे. व्यापक लोकसहभागासह सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणांचा या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सक्रीय सहभाग मिळत आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सातत्याने वेगवेगळया उपक्रमांची आखणी करत असल्याची माहिती श्री. लोणीकर यांनी दिली.
राज्यस्तरावर, विभागस्तरावर, जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर या र्यक्रमाचा आढावा घेण्यात येवून बहुतांश जिल्हयांना मी स्वत: भेटी देवून संपूर्ण स्वच्छतेचे महत्व विशद करत असल्याची माहिती यावेळी श्री.लोणीकर दिली.
2016-17 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रामध्ये 18 लाख शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थेट लोकांपर्यंत जावून वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा वापर व्हावा यासाठी राज्यभर नुकतेच एक अभियान राबविण्यात आले. दि. 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर,2016 या कालावधीत स्वच्छ महाराष्ट्रासाठी -अठरा लाख भेटी या नावाने हे अभियान राबविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांनाही या अभियानादरम्यान आपापल्या कार्यक्षेत्रात गृहभेटी देण्याबाबत सूचना केल्या होत्या. एकूणच या अभियानामध्ये निर्माण झालेल्या वातावरणामुळे मंत्री, खासदार, आमदार, सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष व लोकप्रतिनिधी यांनी या अभियान काळात स्वत: गृहभेटी दिल्या.सर्व जिल्हयांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीसुध्दा या कालावधीत अनेक मुक्काम करुन निश्चित केल्याप्रमाणे राज्यात 18 लाखापेक्ष जास्त गृहभेटी पूर्ण केल्या.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे मार्च 2017 पर्यंत 10 जिल्हे हागणदारीमुक्त होत आहेत. त्यानंतर उर्वरित 23 जिल्हे मार्च 2018 पर्यंत हागणदारीमुक्त करुन महाराष्ट्र राज्य स्वच्छ राज्य घोषीत करण्याबाबचा संपूर्ण कृती कार्यक्रम विभागाने तयार केलेला आहे. राज्यातील एकूण ग्रामीण कुटुंबांपैकी 70.44 टक्के कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा निर्माण करण्यात शासन यशस्वी झालेले आहे. उर्वरित कुटुंबांसाठी वैयक्तिक शौचालयाची सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यभर व्यापक प्रयत्न होत आहेत अशी माहितीही श्री.लोणीकर यांनी दिली.