गडचिरोलीत राष्ट्रसंताच्या जागविल्या स्मृती

0
22

गडचिरोली,दि.14 : राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती व श्री गुरूदेव सेवामंडळ शाखा गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी दोनदिवसीय १५ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचार कृती संमेलनाचा थाटात प्रारंभ झाला. या संमेलनाला साहित्यातील प्रज्ञावंतांची मांदियाळी लाभली. अनेक वक्त्यांनी राष्ट्रसंतांच्या साहित्य व सामाजिक योगदानावर विचार व्यक्त करून राष्ट्रसंतांच्या स्मृती जागविल्या.
कर्मयोगी श्री तुकारामदादा गीताचार्य साहित्य नगरीत आयोजित दोन दिवशीय संमेलनाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा गुरूदेव सेवा मंडळ गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, आचार्य रामकृष्ण अत्रे महाराज, झाडीपट्टीच्या बहिणाबाई कवयित्री अंजनाबाई खुणे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, अड्याळ टेकडीचे डॉ. नवलाजी मुळे, तेलंगणाचे प्रचारक क्रिष्णारेड्डी जिट्टावार उपस्थित होते.
संमेलनाच्या उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी म्हणाले, सामुदायिक प्रार्थना, ध्यान व आचरणातून राष्ट्रसंतांचे विचार प्रदर्शित होणे गरजेचे आहे. तेव्हाच राष्ट्रसंतांच्या विचारांचा अंगिकार झाला असे म्हणता येईल. राष्ट्रसंतांच्या विचारातूनच निकोप समाज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रसंतांचे विचार अंगिकारावे. गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंतांच्या साहित्याचा समावेश करण्याकरिता आपण पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले. याप्रसंगी डॉ. शिवनाथ कुंभारे म्हणाले, व्यक्ती स्वत:चा विचार अधिक करतो. तेव्हा समाजाचा विचार कोण करणार, राष्ट्रसंतांनी अध्यात्म, अंधश्रद्धा यावर मार्मिक भाष्य ग्रामगितेत केले आहे. राष्ट्रसंतांच्या प्रत्येक ओवीतून जीवन जगण्याचा मार्ग आहे. त्यांचे विचार योग्य जीवनशैलीची शिकवण देतात. त्यामुळे सामुदायिक प्रार्थना व ध्यान प्रत्येक घरात पोहोचविण्याची गरज आहे.
मार्गदर्शन करताना बंडोपंत बोढेकर म्हणाले, खरे साहित्य तेच असते, जे सामाजिक विपरित परिस्थितीत व प्रवाहात टिकून राहते. राष्ट्रसंतांचे साहित्य समाज उत्थान करणारे आहे. राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या साहित्यातून नवसमाज निर्मितीची परिभाषा आहे. साहित्यकार नवसृष्टीची निर्मिती करणारा एक प्रकारचा वाटाड्या आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. संमेलनाच्या उद्घाटनानंतर आयोजकांच्या वतीने डॉ. हरिश्चंद्र बोरकर, प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, आचार्य रामकृष्ण अत्रे महाराज, डॉ. शिवनाथ कुंभारे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, डॉ. नवलाजी मुळे, कवयित्री अंजनाबाई खुणे, क्रिष्णारेड्डी जिट्टावार यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
संमेलनादरम्यान आरोग्य प्रबोधिनीच्या वतीने व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती देणारे पोस्टर लावण्यात आले. या पोस्टरच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात आली. श्री गुरूदेव सेवा मंडळ व अन्य साहित्य मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावरील तसेच राष्ट्रसंतांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांचे स्टॉलही येथे लावण्यात आले होते. सकाळपासून दिवसभर संमेलनस्थळी विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. संमेलनाला राज्याच्या अनेक जिल्ह्यातून गुरूदेवभक्त उपस्थित होते.संमेलनाचे संचालन अ‍ॅड. राजेंद्र जेनेवार तर आभार भाऊराव पत्रे यांनी मानले. तत्पूर्वी सकाळी खा. अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांसह श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या मुख्य शाखेतील राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
साहित्य विचारकृती संमेलनात विविध ग्रंथांचे विमोचन संमेलनाध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, कवयित्री अंजना खुणे, डॉ. शिवनाथ कुंभारे, आचार्य अत्रे महाराज, बंडोपंत बोढेकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रातिनिधिक काव्यसंग्रह ‘नक्षत्रांची काव्यफुले’, पत्रकार केशवराव दशमुखे यांचा ‘ग्रामगीता संदेश विशेषांक’, डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांचा ‘चारोळी काव्यसंग्रह’, प्रा. डॉ. विठ्ठल चौथाले यांच्या ‘शोध अभिरूचीचा’ आदी ग्रंथांचा समावेश आहे. दरम्यान डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा ‘झाडीपट्टीचे लोकरामायण’ या ग्रंथाचेही विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.