महाराष्ट्राची ‘वारी’ च ठरली ‘लय भारी’

0
16

नवी दिल्ली, दि. २९ – प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील संचलनात सामील झालेल्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या वारीवरील आधारित चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथामधून वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारी वारीच ‘लय भारी’ ठरली आहे.

प्रजासत्ताक दिनीच्या संचलनात विविध राज्यांचे एकुण २५ चित्ररथ सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकावला असून दुस-या क्रमांकावर झारखंडच्या चित्ररथाला स्थान मिळाले आहे. तर कर्नाटकच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे. या चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने चित्ररथाचे दिग्दर्शक शेखर मोरे यांनी आनंद व्यक्त केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनात विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱया चित्ररथांचेही संचलन झाले. यंदा महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथातून वारकरी परंपरेचे दर्शन घडविण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायक-संगीतकार अजय-अतुल यांच्या बहुचर्चित माऊली…माऊली गाण्याचा वापर चित्ररथाचे पार्श्वसंगीत म्हणून करण्यात आला होता तसेच ‘उदे ग अंबे उदे’ गाण्याने आई भवानी मातेच्या जागरण गोंधळ नृत्याची संस्कृती देखील राजपथावर सादर करण्यात आली. वारीवर आधारीत असलेल्या या चित्ररथाने राजपथावरील संचलनावेळी उपस्थितांचे मने जिंकली होती.