तलाठयांचा संप आणि आंदोलन मागे महसूल मंत्रीच्या आवाहनाला प्रतिसाद

0
7

औरंगाबाद, दि. 29 एप्रिल  –महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून तलाठयांचा संप आणि आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा तलाठी महासंघाच्या वतीने आज येथे करण्यात आली.

तलाठी महासंघाचे अध्यक्ष अशोकराव कोकाटे, सरचिटणीस समिती तुपे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी आज येथील सुभेदारी विश्रामगृह येथे खडसे यांची भेट घेवून, 1987 पासून प्रलंबित असलेल्या तलाठयांच्या विविध मागण्या सोडविण्याच्या बाबतीत खडसे यांनी पुढाकार घेतला व या मागण्या मंत्रीमंडळ बैठकीत तत्वत: मान्य करुन घेतल्या. त्यामुळे आम्ही आमचे आंदोलन आणि संप त्वरीत मागे घेत आहोत, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच तलाठयांच्या मुख्य मागण्यांना मान्यता मिळविण्याच्या दृष्टीने त्या मार्गी लावल्याबद्दल आणि इतर मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल तलाठी महासंघाने यावेळी खडसे यांच्या प्रती आभार व्यक्त केले.

मंत्री मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या संबंधाने निर्णय घेण्यात आला असून राज्यातील 12,327तलाठी सझांची पुनर्रचना करण्यास मंत्रीमंडळाने तत्वत: मान्यता दिली आहे.  तलाठयांची रिक्त व वाढीव पदे भरण्या संदर्भात येत्या ऑक्टोबर अखेर निर्णय घेण्याचा आम्ही प्रयत्न करु, असे आश्वासन महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी कालच मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत तलाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते.

या बैठकीत सात-बारा उतारा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्याबाबत येणा-या अडचणी, ब्रॉडबॅण्ड सुविधा, तलाठयांना एन.आय.सी. चे प्रशिक्षण,  तलाठयांसाठी कार्यालयीन इमारत, तसेच काम करण्यासाठी लॅपटॉप आणि प्रिंटर पुरविणे, इत्यादी विषयावर तपशीलवार चर्चा झाली.   हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन खडसे यांनी या बैठकीत दिले होते. त्याची दखल घेवून तलाठयांनी संप मागे घेतला आहे.