नवीन जिल्हे व तालुके निर्मितीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन- संजय राठोड

0
13

मुंबई, दि. 19 : राज्यातील नवीन जिल्हे निर्मितीसाठी
करावयाच्या विभाजनाबाबत निकष निश्चित करण्यासाठी अपर मुख्य सचिव, महसूल
यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल
प्राप्त झाल्यावर शासन त्यावर निर्णय घेईल, असे महसूल राज्यमंत्री संजय
राठोड यांनी विधानपरिषदेत सांगितले.
नवीन जिल्हे व तालुके निर्मितीबाबत सदस्य सर्वश्री
अब्दुल्लाखान दुर्राणी, सुनिल तटकरे, माणिकराव ठाकरे यांनी प्रश्न
उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. राठोड बोलत
होते.
राठोड म्हणाले की, तालुका विभाजनाचे निकष निश्चित करण्याबाबत कोकण
विभागाचे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचा
अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. तर जिल्हा विभाजनासाठी गठित केलेल्या
समितीला 31 जुलै, 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या समितीचा अहवाल
प्राप्त झाल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव
मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल, असेही महसूल राज्यमंत्र्यांनी यावेळी
सांगितले.