१२वी बोर्डाच्या पेपर तपासणीसाठी ‘असहकार’ आंदोलन

0
11

मुंबई, दि. २२ – दीर्घकाळ प्रलंबित आश्वासित व मान्य मागण्यांवर येत्या १० दिवसात अंमलबजावणी न झाल्यास नाइलाजाने ३ मार्च २०१७ पासून १२ वी बोर्डाच्या पेपरची तपासणी न करता ‘असहकार’ आंदोलन करण्याचा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे. शिक्षण मंत्र्यांनी वेळोवेळी आश्वासने देऊन अंमलबजावणी होत नसल्याने हे आंदोलन करत असल्याचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने सांगितले.
संघटनेचे अध्यक्ष अनिल देशमुख म्हणाले की, याआधी संघटनेने २९ नोव्हेंबर,२२ डिसेंबर २०१६ ला आझाद मैदानावर इशारा आंदोलने केली. त्यानंतर १२ जानेवारीला ‘जेल भरो’ आंदोलन केले. त्याहीवेळी शिक्षणमंत्र्यांनी १५ दिवसांत अंमलबजावणीचे आश्वासन दिले. परंतु तेही हवेतच विरले. अधिकारी शिक्षण मंत्र्यांचे ऐकत नसल्यास अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे व शिक्षकांवरील अन्याय त्वरित दूर करावा. अन्यथा नाइलाजाने आंदोलन करावे लागेल व त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाचीच असेल, असे शासनास संघटनेने कळविले आहे.