खडसेंनी फडणवीस सरकारला झापले!

0
5

मुंबई,दि.२९: भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी फडणवीस सरकारला खडे बोल सुनावत चांगलेच झापले.एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारच्या नाकी दम असताना, आता भाजपमधील सर्वात ज्येष्ठ नेत्यानेच सरकारची कानउघडणी केली आहे.
खडसेंनी विधानसभेत सरकारला खडे बोल सुनावले.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही काय फक्त विदर्भाचे मंत्री आहेत का? विदर्भात 24 तास वीज कनेक्शन देता, जळगावला 14 हजार शेतकऱ्यांनी पैसे भरले, मात्र अजून कनेक्शन का नाही, असा सवाल खडसेंनी विचारला.निवडणुकीत आश्वासन दिले होतं 24 तास वीज देऊ. पण वीज मुबलक नाही. आपले सरकार आले,आपण शब्द पाळला पाहिजे असा खणखणीत सल्लाही खडसेंनी दिला.शेतकऱ्याला रात्री 8 वाजता वीज देता, मात्र शेतकऱ्याने रात्रीच शेतात जायचं का. अधिकाऱ्यांना जाऊन सांगा, रात्री शेतात काही पेरता येते का, असंही खडसे म्हणाले.शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याचं वीज बिल थकले असेल, तर व्याज माफ करा, दंड माफ करा. वीज कनेक्शन कट करणार नाही, असे आश्वासन सरकारने द्यावं, असंही खडसे म्हणाले.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्राचं भविष्य काय, होणार की नाही. 15 – 15 वर्ष वाट बघायला लावू नका, असाही सल्ला खडसेंनी केला.राज्यभरात औद्योगिक क्षेत्रात किती गुंतवणूक झाली? मुंबई पुणे, नाशिक कॉरिडॉर वगळता उद्योगांची स्थिती काय? उत्तर महाराष्ट्रात एखादं तरी युनिट आले का , एक कारखना उभा राहिला का याची माहिती द्यावी, असे खणखणीत सवाल, खडसेंनी विचारले.