राजू शेट्टींनी आता नागपुरात आंदोलन करावे – अजित पवारांचा टोला

0
10

कोल्हापूर-शेतकऱयांच्या प्रश्नावर राज्यातील युतीचे सरकार काहीच भूमिका घेत नसताना, शेतकऱयांचे नेते म्हणवून घेणारे राजू शेट्टी गप्प का आहेत, असा सवाल उपस्थित करीत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी राजू शेट्टीवर टीका केली. ते म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकरी होरपळत आहे. युतीचे सरकार आल्यानंतरही विदर्भातील शेतकऱयांच्या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. उलट त्या वाढत आहेत. या सर्व प्रश्नावर राजू शेट्टी यांनी बोलले पाहिजे. आघाडी सरकारने त्यांच्या काळात शेतकऱयांना कर्जमाफी केली होती. मात्र, युती सरकारने अद्याप कर्जमाफी केलेली नाही. आमच्यावेळी राजू शेट्टी यांनी बारामती, कराडमध्ये येऊन आंदोलन केले होते. आता त्यांनी नागपूरमध्ये जाऊन आंदोलन करावे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.