रत्नागिरी,दि.15 : देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न घोषित करावा, त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा व्हावा, तसेच ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, या प्रमुख मागण्यांसह ओबीसींच्या इतर मागण्यांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वारापाशी सकल ओबीसीतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
सकल ओबीसी समाजातर्फे ११ डिसेंबर २१०७ ते ३ जानेवारी २०१८ या कालावधीत लढा सावित्री आईच्या सन्मानाचा मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रमुख शहरात लाक्षणिक उपोषण व सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न घोषित करावा, त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा व्हावा, या प्रमुख मागण्यांसह ओबीसीमधील सर्व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्यात यावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.
रत्नागिरीतही लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकल ओबीसी समाजाचे नेते अशोक गीते, सकल ओबीसी समाजाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा कांचन जांबोटी – नाईक यांच्या समवेत रत्नागिरीच्या दिलावर गोदड, भंडारी समाजाचे राजीव कीर, दत्तराज घोसाळे, कमलाकर थूळ, खलिल वस्ता, जितेंद्र शिवगण, अरूण मोर्ये, सरफराज शेकासन, रझनीम मोडम, सुधाकर शिवनेकर, बबन लिगारे, महंमद साखरकर, शांताराम गोंधळी, अखतर वाडकर, अजयेत बांगी, मुदस्सर सारंग, देखरूखचे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, दीपक दीपंकर, चिदानंद जाधव, उमेश शेट्ये आदींनी पाठिंबा दर्शवत सहभागी झाले होते.





