मुंबई,दि.2(वृत्तसंस्था) : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.सकाळच्या सत्रात मिलिंद एकबोटेंची याचिका ऐकण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला होता. पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल करताना चुकीचे आरोप लावले असल्याचा दावा करत हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मिलिंद एकबोटेंनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.
तात्काळ सुनावणीसाठी बुधवारी हे प्रकरण नव्या खंडपीठापुढे सादर करण्यात आले होते. न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी पी कुलाबावाला यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी घेण्यास नकार देत, दुसऱ्या खंडपीठापुढे जाण्याचे आदेश एकबोटे यांना दिले होते. त्यामुळे एकबोटे यांनी दुपारी दुसऱ्या खंडपीठापुढे आपली याचिका सादर केली. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली.एक जानेवारीला कोरेगाव भीमा इथं शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर सणसवाडीत दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.
ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस आपण तिथं नव्हतो, तसेच आपल्या झालेल्या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचा दावा एकबोटे यांनी केला आहे. एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील सत्र न्यायालयाने 22 जानेवारीला फेटाळला. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती